
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत काही जण नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 6 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे, तर 32 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेचे कारण
पूल कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने पुण्यातील पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.