मेक इन इंडिया नव्हे, असेंबल्ड इन इंडिया; उत्पादन घटलं, बेरोजगारी वाढली, पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर जोरदार टीका केली. ‘मेक इन इंडिया’मुळे देशात उत्पादन वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र राहुल गांधी यांनी हा दावा फोल असल्याचे सांगत, देशातील उत्पादन क्षेत्र ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून, युवकांमधील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, असा आरोप केला.

X वर एक व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “मेक इन इंडिया योजनेमुळे देशात उत्पादन वाढल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर आहे आणि बेरोजगारी सर्वकालीन उच्चांकावर आहे. 2014 पासून देशातील उत्पादन 14 टक्क्यांनी घटले आहे आणि चीनमधून आयात दुप्पट झाली आहे.”

ते म्हणाले, “मोदीजींनी घोषणाबाजीची कला आत्मसात केली आहे, उपायांची नाही. सत्य हे आहे की आपण वस्तू असेंबल्ड करतो, आयात करतो. पण उत्पादन करत नाही. याचा फायदा चीनला होतो.”

राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाच्या आर्थिक मॉडेलवर टीका केली आणि म्हटलं आहे की, “पंतप्रधान मोदींकडे कोणतेही नवीन आयडिया नाहीत. त्यांनी शरणागती पत्करली आहे. पीएलआय योजना देखील आता शांतपणे मागे घेण्यात आली आहे. हिंदुस्थानात बदलाची गरज आहे.”

दरम्यान, राहुल यांनी नवी दिल्लीतील नेहरू प्लेस येथे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स दुरुस्त करणाऱ्या दोन तरुणांसोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी दोघांकडून त्यांच्या कामाबद्दल माहिती घेताना दिसत आहे. याचवेळी बोलताना त्यांनी ‘असेंबल्ड इन इंडिया’ हा नारा दिला आहे.