
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ढळढळीत हेराफेरी केली गेली. ही निवडणूक भाजपने चोरली. ही छोटी-मोठी गडबड नसून, आपल्या राष्ट्रीय संस्थांवर कब्जा करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले जात आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाद्वारे केला आहे. त्यांच्या या लेखामुळे देशभरात खळबळ उडाली असून, केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या मॅच फिक्सिंग कारभारावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
राहुल गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकाला लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहारांची सखोल मांडणी केली आहे. निवडणूक आयुक्तांच्या निवडीपासून मतदार यादी घोटाळा आणि पुराव्यांच्या लपवाछपवीपर्यंत त्यांनी लेखात सविस्तर आढावा घेतला आहे. राहुल गांधींनी 2009 पासूनच्या निवडणुकांची आकडेवारीही दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे घोटाळे केले गेले, भाजपने ही निवडणूक कशी चोरली यासाठी राहुल गांधींनी पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
1) निवडणूक आयुक्त निवडीवरच कब्जा
निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश या चार जणांच्या समितीद्वारे केली जात होती. मात्र, ‘निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा 2023’ करण्यात आला. त्यात निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांची हकालपट्टी करण्यात आली. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडून ‘दोनास एक बहुमताने’ निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची काळजी घेण्यात आली. विरोधी पक्षनेत्याचे मत निप्रभ केले गेले. निवडणूक आयोगावर निवडीपासूनच कब्जा मिळविण्यात आला. ‘पंच’ निवडीची पद्धतच ताब्यात घेतली गेली याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले.
2) फक्त पाच महिन्यांत तब्बल 41 लाख मतदारांची वाढ
2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या 8 कोटी 98 लाख होती. पाच वर्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदार संख्या 9 कोटी 29 लाख झाली. धक्कादायक म्हणजे, लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संख्या 9 कोटी 70 लाखांवर पोहोचली. पाच वर्षांत 31 लाखांची वाढ आणि पाच महिन्यांतच 41 लाखांची वाढ झाली, अशी आकडेवारीच राहुल गांधींनी दिली आहे.
3) मतदारांच्या संख्येपेक्षा अधिक मतदान
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर अचानक मतदान वाढले असे आरोप अनेकदा केले गेले. याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले आहे. सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे कोठेही चित्र नव्हते. निवडणूक आयोगाने सायंकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के असल्याचे जाहीर केले होते. मात्र, दुसऱया दिवशी अंतिम टक्केवारी 66.05 टक्के एवढी जाहीर केली. तब्बल 7.83 टक्के वाढ दाखवली. सुमारे 76 लाख मतदारांची वाढ झाली होती. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी घडले नव्हते.
4) 12 हजार मतदान केंद्रांवर बोगस मतदान
विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान झाले याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात सुमारे 1 लाख मतदान केंद्रे आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपची ज्या 85 मतदारसंघांत निराशाजनक कामगिरी झाली त्यातील 12 हजार मतदान केंद्रांवरच विधानसभा निवडणुकीत वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक होती. निवडणूक आयोग म्हणते, तरुणांचा सहभाग वाढला. तर 1 लाखापैकी केवळ 12 हजार मतदान केंद्रांवरच तरुणांचा सहभाग कसा वाढला? उर्वरित 88 हजार केंद्रांवर हे चित्र का दिसले नाही, असा महत्त्वपूर्ण सवाल राहुल गांधींनी केला आहे. या 12 हजार मतदान केंद्रांवर सायंकाळी पाचनंतर प्रत्येक केंद्रावर 600 मतदारांची संख्या होती. एका मतदाराला एक मिनिट वेळ लागतो. या हिशेबाने सायंकाळी पाचनंतर 10 तास मतदान सुरू राहायला हवे होते; पण ते घडलेच नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
5) सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डस्ची लपवाछपवी
निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रश्नांवर अनेकदा मौन बाळगले, तर कधी आक्रमक भूमिका घेतली. पण प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या छायाचित्र असलेल्या मतदार याद्या दिल्या नाहीत. धक्कादायक म्हणजे, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मतदानाची व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्ही विरोधी पक्षांना दिले नाही. ही लपवाछपवी करण्यासाठी 1961च्या निवडणूक आचार नियम कलमांमध्ये सुधारणा केली, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा
रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा महायुती निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रात विजयी झाली आहे. ज्या मतदारसंघात जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपला मिळाले आहे. आम्ही पुराव्यानिशी बोगस मतदान दाखवतो. हिंमत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहे.
ही मॅच फिक्सिंग होती
मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधार्यांनी निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झाले याचे सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाजपने बोगस मतदानाने निवडणूक जिंकली
महाराष्ट्रातील निवडणुकी मोठय़ा प्रमाणात बोगस मतदान घडवून सत्ताधारी पक्षाकडून निवडणूका जिंकण्यात आल्या. मतदार यादीतील बोगस नावांच्या आधारे हे मतदान करण्यात आले. निवडणूक निकालातही हेराफेरी करण्यात आली आहे. यासंदर्भातील पुरावे न्यायालयात देणार असल्याचे कॉँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी असते. फिक्सिंग करणारा संघ एखादा सामना जिंकू शकतो. मात्र, त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला तडा जातो. मॅच फिक्सप्रमाणे निवडणुका होत राहिल्या तर लोकशाहीवरील हा विषप्रयोगच ठरेल!
भाजपने 89 टक्के जागा कशा जिंकल्या?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप केवळ 32 टक्केच जागा जिंकू शकली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने लढवलेल्या 149 जागांपैकी 132 म्हणजे 89 टक्के जागा जिंकल्या. पाच महिन्यांतच असे कसे घडले, असा सवालही राहुल गांधींनी केला.
कामठी मतदारसंघात ‘कमळाकार चुंबक’
महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांत घोटाळे करून भाजपने विधानसभा निवडणूक जिंकली हे सांगताना राहुल गांधींनी कामठी मतदारसंघाचे उदाहरण दिले. लोकसभा निवडणुकीत कामठीत काँग्रेसला एक लाख 36 हजार मते, तर भाजपला एक लाख 19 हजार मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख 34 हजारवर, तर भाजपला एक लाख 75 हजार मते मिळाली. पाच महिन्यांतच कामठीत 35 हजार नवीन मतदारांची भर पडली आणि ही सर्व मते भाजपलाच मिळाली. यामागे ‘कमळाकार चुंबक’ कसे आहे ते लक्षात येते, असे राहुल गांधींनी सांगितले.
हा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान
हा महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागं झालं पाहिजे. आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणुकीत किती वाढले हे सगळं सप्रमाण दिलं असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पालिका निवडणुकीत याच पॅटर्नचे षड्यंत्र
जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यांची उत्तरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का देत आहेत? आता हाच मतदान चोरीचा पॅटर्न आगामी निवडणुकांमध्ये वापरण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे तुम्ही स्वाक्षरी नसलेल्या आणि माहिती देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पत्रकांचे माध्यमांमार्फत वितरण करणे, हा गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्याला काहीही लपवायचे नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची थेट उत्तरे द्या. संध्याकाळी 5 नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा.
निवडणूक आयोगाचा हास्यास्पद भावनिक खुलासा
मतदार याद्यांबाबत करण्यात येणारे आरोप निराधार व कायद्याचा अपमान करणारे आहेत. हे आरोप प्रामाणिक काम करणाऱया लाखो निवडणूक कर्मचाऱयांना निराश करणारे आहेत. मतदारांच्या कोणत्याही प्रतिकूल निकालानंतर, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करणे म्हणजे निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असा भावनिक खुलासा केंद्रीय निवडणूक आयोगाने केला आहे.