‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी

पार्थ पवार यांच्या पुण्यातील महाभूखंड घोटाळ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीन चोरी असून या प्रकरणावर पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी एक्स पोस्टमध्ये म्हणाले, महाराष्ट्रामध्ये दलित बांधवांसाठी आरक्षित असलेली 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांना मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकण्यात आली. इतकेच नाही तर मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. म्हणजे लूटही केली आणि करांमध्ये सूटही दिली. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीनचोरी आहे.

त्यांना माहिती आहे की, कितीही लुटले तरी मतचोरी करून ते पुन्हा सत्तेत येतील. यांना ना लोकशाहीची पर्वा आहे, ना जनतेची, ना दलित बांधवांच्या हक्काची. मोदीजी या प्रकरणावर तुमचे मौन बरेच काही सांगून जात आहे. दलित आणि वंचितांचे हक्क हिरावून घेणाऱ्या लुटारूंवर तुमचे सरकार अवलंबून असत्यानेच तुम्ही गप्प आहात का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.