सरकारी यंत्रणांची बेफिकिरी सामान्यांच्या जीवावर बेततेय; राहुल गांधींनी फटकारले!

राजधानी नवी दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर परिसरात कोचिंग क्लासच्या तळमजल्यावर पाणी भरल्याने तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सुरक्षित आणि आरामदायी जीवन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तसेच सरकारची जबाबदारी आहे. मात्र वास्तवात सरकारी यंत्रणांच्या बेजबाबदार कारभारामुळे सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

दिल्लीच्या दुर्घटनेनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान राहुल गांधी यांनीही दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

राहुल गांधी यांची सोशल मीडियातील पोस्ट

राजधानी दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया नोंदवतानाच राहुल गांधी यांनी सरकारी यंत्रणांच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसातच आणखी एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

पायाभूत सुविधांचा विस्कळीतपणा हे व्यवस्थेचे एकत्रित अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नगरनियोजन तसेच सरकारी यंत्रणांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक स्वतःचा जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि सुखसुविधांयुक्त जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तसेच सरकारची जबाबदारी आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.