Rain Update – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

मागील जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातील जोर वाढला आहे. शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर शेजारच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवून हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे जाहीर करतानाच विविध जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस अर्थात 18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. या कालावधीत वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या रहिवाशांना तसेच मच्छीमारांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान खाते, पालिका प्रशासन आणि आपत्कालीन विभागाने दिल्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करून रहिवाशांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.