
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घाटात ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या महामार्ग पोलिसांचीही दमछाक होत आहे.
परशुराम घाट दरवर्षीच कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरतो. जुना घाटमार्ग असो अथवा नवीन सुरु असलेला असो कोकणवासीयांना त्रासदायक ठरत आहे. बाप्पाचे आगमन बुधवारी होत असून, मुंबईकर कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, अवघड परशुराम घाट व त्यातच घाटातील एकेरी मार्ग यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होत आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील हद्दीतील सीमेवर वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडून येणारा गाड्यांचा ओघ पाहता त्यांचीही दमछाक होत आहे. वाहनांची संख्या अजूनही वाढणार असून, पोलिस यंत्रणेची दमछाक होणार आहे.