
पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या ‘सायकल वारी’ला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या आषाढीला सुमारे तीन हजार आबालवृद्ध सायकलिष्ट वारकरी सहभागी होणार आहेत. आयपीएस पोलीस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या ‘सायकल वारी’चे हे तेरावे वर्ष आहे.
बैजल यांनी 2012 मध्ये नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी सुरू केली होती. बैजल यांची आई श्री विठ्ठलाची भक्त होती. त्यामुळे तिच्या पश्चात तिचे स्मरण म्हणून सुरू झालेल्या या सायकल वारीला राज्यभरातील सायकलिस्टकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी एका जिह्याकडे या ‘सायकल वारी’चे यजमानपद दिले जाते. यावर्षी ‘लातूर सायकलिस्ट’ने सर्व जबाबदारी घेतली आहे.
यावर्षी राज्यभरातून 70 सायकल क्लबमधील तीन हजार सायकलिस्ट येत्या 20 जून रोजी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. 22 जून रोजी नगरप्रदक्षिणा आणि रिंगण सोहळा करून या वारीची सांगता होणार आहे.