रोखठोक – महाराष्ट्रात गुंडांचे राज्य! कोण चालवीत आहे?

पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत. महाराष्ट्रातील कंत्राटदार, व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकले आहेत. मंत्रालयात व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड टोळय़ांबरोबर बैठका होतात. हे गंभीर वाटत नाही काय?

पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथच्या गुहेत जाऊन तपश्चर्या व आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. मोदी खोटे बोलतात व त्या खोटेपणाची ‘री’ त्यांचे लोक ओढतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी साधारण तासभर बोलले. ते विषय सोडून बोलले. त्यातील 80 मिनिटे ते काँग्रेसवरच बोलत राहिले. पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवले, असे एक विधान त्यांनी भाषणात केले. इंदिरा गांधींवरही ते बोलले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला देश मेहनतीने उभा करायचा हा संदेश नेहरूंचाच होता. मोदी यांच्या मते, नेहरूंनी देशवासीयांना आळशी बनवले. नेहरूंना असे बोलणे हा समस्त कष्टकरी देशवासीयांचा अपमान आहे. स्वातंत्र्यानंतर नवा हिंदुस्थान घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सगळय़ात जास्त काम केले पाहिजे व त्यासाठी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी, “आराम हराम है” हा नारा दिला. पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून 1959 साली केलेल्या भाषणात हा उल्लेख आहे. या भाषणात नेहरूंनी लोकांना स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. (हाच आत्मनिर्भर होण्याचा मंत्र आता मोदी यांनी चोरला!) नेहरू तेव्हा काय म्हणाले होते ते पहा, ‘आपल्याकडे हिंदुस्थानात जास्त मेहनत करण्याची सवय नाही. त्यात आपला दोष नाही. युरोपियन, जपानी, चिनी, रशियन, अमेरिकन लोक जितकं काम करतात, तितकं आपण करत नाही. जादूची कांडी फिरली व तिथे सुबत्ता आली असे घडलेले नाही. मेहनत आणि हुशारीने ते सुखी झाले. आपणही मेहनत आणि हुशारीने पुढे जाऊ शकतो. देशाला पुढे जाण्यासाठी कष्ट व मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही.’ नेहरूंनी देशाला आळशी बनवले असे मोदी म्हणतात. मग देशातील 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य फुकटात वाटणाऱया मोदींनी जनतेला आळशी व गुलामच बनवले आहे. लोकांना रोजगार हवा आहे व मोदी त्यांना रामाचे फुकट दर्शन घडवायला निघाले आहेत. पुण्यातील एका ‘आयटी’ कंपनीत इंजिनीअरची एक जागा भरायची होती, पण त्या एका जागेसाठी पुण्यात त्या कंपनीसमोर साडेतीन हजार ‘बेरोजगार’ इंजिनीअर रांगेत उभे असल्याचे छायाचित्र महाराष्ट्रात सर्वच माध्यमांनी प्रसिद्ध केले. मोदी यांनी देशातील सुशिक्षित तरुणांना हे असे रस्त्यांत निराधार अवस्थेत उभे केले, कारण नोकऱया निर्माण करणारे सर्वच सार्वजनिक उपाम मोदी यांनी आपल्या मित्रांना विकले.  हे सर्व सार्वजनिक उपाम पंडित नेहरू यांनी निर्माण केले. ते मोदी यांच्या अमृत कालात नष्ट झाले. त्यामुळे बेरोजगार तरुण गेल्या दहा वर्षांत मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी, गुंडगिरीकडे वळला. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यही त्यास अपवाद नाही.

महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचेच राज्य सुरू आहे व त्यास पंतप्रधान मोदी व शहा जबाबदार आहेत. गुंड खुलेपणाने राज्यकर्त्यांना भेटू शकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिवसेनेचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी मारिस या गुंडाने गोळय़ा झाडल्या व हत्या केली. बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज. हा आत्मविश्वास गुंडांना मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांमुळे मिळत आहे!

गुन्हेगारी का फोफावली?

पंतप्रधान मोदी व अमित शहांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रावर लादले. या दोघांच्या छत्रछायेखाली गुन्हेगारी-गुंडगिरी जोरात फोफावली. भ्रष्टाचार, अपहरण, खंडणी, हत्या हा व्यापार भरभराटीस आला व इतर सर्व उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले तरी शिंदे-पवार काळात गुन्हेगारीचा व्यापार वाढला. महाराष्ट्रातील ठेकेदार आणि इंजिनीअर संघटनांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त पत्र लिहून गुंडगिरीपासून संरक्षणाची मागणी केली. ‘सरकारात सहभागी असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते धमक्या देऊन वसुली करतात, खंडणी मागतात. नाहीतर ठेकेदारांची अधिकृत सरकारी कामे अडवून ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱयांवर हल्ले केले जात आहेत. आधी संबंधित ठेकेदारांची खोटी पार करायची व नंतर पैशांची मागणी करायची. यामुळे अनेक विकासकामे खोळंबून पडली. ठेकेदारांच्या मूळ रकमांपेक्षा खंडणी वसुलीचा आकडा जास्तच आहे व एकाच वेळी सत्तेतील तीन तीन पक्षांच्या पदाधिकाऱयांना ही खंडणी देऊन आम्ही सगळे मेटाकुटीस आलो आहोत’ असे या पारीत सांगितले आहे व ते गंभीर आहे. महाराष्ट्र राज्याच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण?

हजारो कोटींची कामे

रस्ते महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या माध्यमातून हजारो कोटींची कामे राज्यात सुरू आहेत. एका सार्वजनिक बांधकाम खात्यातच 50 हजार कोटींची कामे सुरू आहेत. रस्ते, इमारती, शासकीय संस्थांच्या उभारणीचे हे काम. शिवाय जिल्हा परिषदांच्या माध्यमांतून 15 हजार कोटींची कामे सुरू आहेत. जलसंधारण 3500 कोटी, सिंचन विभाग 2,500 कोटी, पर्यटन विभागाचा दोन हजार कोटींचा निधी विविध प्रकल्पांत वापरला जातोय. या सगळय़ा कामांची ‘टेंडर्स’ ज्यांना मिळाली ते सर्व कंत्राटदार, छोटे उद्योजक, प्रकल्पांवर काम करणाऱया अभियंत्यांनी गेल्या दोन वर्षांतील खंडणीखोरीपुढे हात टेकले.

एकीकडे राजकीय कार्यकर्ते, गुंड टोळय़ा यांचे खंडणीचे वाटप व दुसरीकडे मंजूर झालेल्या रकमेतील 30-40 टक्के सरळ मंत्र्यांच्या हवाली. त्यामुळे विकासाला वाळवी लागली. अजित पवार यांचा सिंचन घोटाळा 70 हजार कोटींचा, असे स्वत: पंतप्रधान जाहीर करतात, पण तेच पवार आज राज्याचे अर्थमंत्री व सर्व प्रकारच्या निधी वाटपाचे गुन्हेगारीकरण झाले. भ्रष्टाचार हा शब्द त्यामुळे मागे पडला.

गायकवाड यांचा हल्ला!

महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे आज पूर्णपणे गुन्हेगारांच्या हाती गेली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात घुसून शिंदे गटाच्या लोकांवर गोळीबार केला. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंडांचे राज्य चालवीत आहेत व ते गुंडांना पोसत असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. त्यावर भाजपचे सर्व मंत्री व नेते तोंडास कुलूप लावून बसले, कारण महाराष्ट्रातील शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद आहेत. मुंबईतील लुटीचा मोठा वाटा दिल्लीतील भाजपच्या तिजोरीत जातोय हा त्यामागचा सरळ अर्थ. त्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राची पुरती वाट लागली तरी चालेल. भारतीय जनता पक्षाचाच एक आमदार स्वसंरक्षणासाठी हातात बंदूक घेतो व पोलीस स्टेशनात गोळीबार करतो. यावर गृहमंत्र्यांची प्रतिािढया शून्य! भाजपवाले उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात, पण शिंदे यांनी पोसलेल्या गुन्हेगारीवर, वसुली धंद्यांवर बोलत नाहीत. महाराष्ट्रात जे सुरू आहे त्या पापाचे ते वाटेकरी बनले आहेत. नगर जिल्हय़ातील राहुरी येथे दाभाडे या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाली. असे प्रकार महाराष्ट्रात रोज घडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मंत्रालयात व त्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गुंड टोळय़ांच्या म्होरक्यांबरोबर बैठका घेतात. गुंडांना त्यांच्या पक्षात प्रवेश देतात. तुरंगातील गुंडांची सुटका व्हावी यासाठी हस्तक्षेप करतात.

मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस म्हणे  4 फेब्रुवारी रोजी झाला. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुंडांची मांदियाळीच जमली. शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज गुंडांनी लावले. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. गुंडगिरीचे इतके उघड समर्थन व उदात्तीकरण महाराष्ट्रात याआधी कधीच झाले नव्हते. शिंदे गटात प्रवेश करणाऱया गुंडांना लगेच पोलीस संरक्षण देऊन सन्मान केला जातो, हे अत्यंत गंभीर चित्र आहे. ज्या गुंडांची मुंबई-पुणे-ठाण्यात पोलिसांनी धिंड काढली, त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी शिंदे यांनी आज पोलीस लावले. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारही त्याकामी मागे नाहीत. तेही गुंडांच्या भेटीला पुष्पगुच्छ घेऊन जातात व श्री. अजित पवार ‘मोदींकडे आपली वट आहे,’ अशी भाषणे करतात. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर अनेक गुंडांचे फोटो प्रसिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘संघ’ परिवाराने ते फोटो पाठवायला हवेत. त्याचा उपयोग होणार नाही. तरीही महाराष्ट्रात त्यांनी काय कचरा उधळला आहे ते त्यांना कळू द्या. चोऱया, लुटमार, दहशत व हत्या हेच महाराष्ट्राचे प्राक्तन बनले आहे. खतरनाक गुंड मंत्रालयात शिरून त्यांचे ‘रिल्स’ बनवतात व त्यांना अडवणाऱया कर्मचाऱयांना शिंदे पुत्राच्या नावाने धमक्या दिल्या जातात. हे सर्व महाराष्ट्रात का घडावे? महाराष्ट्र गुंडांचे राज्य व्हावे यासाठीच मोदी-शहांनी शिवसेना फोडली. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर ललित टेकचंदानी याने दिलेला जबाब पोलिसांनीच उघड केला तर सरकारची उरली सुरली इज्जतही खतम होईल. शिंदे सरकारने गुंड पोसले. तसे गुंडांना संरक्षण देणारे पोलीस अधिकारीही पोसले. हे पोलीस अधिकारी गुंड टोळीचे सदस्य असल्याप्रमाणेच आज काम करीत आहेत. जणू काही शिंदे-पवार-फडणवीसांचे महाराष्ट्रातील गुंडाराज अनंत काळ चालणार आहे.

गुंडांचे राज्य जाईल व त्यांना मदत करणाऱया खाकी वर्दीतल्या गुंडांच्या हस्तकांचेही पंचनामे होतील. महाराष्ट्रात पाप टिकणार नाही! मोदी यांच्या डोळय़ांसमोरच हे घडेल!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]