मौलवींसोबत भागवतांचे अडीच तास चिंतन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज देशातील 70 हून अधिक मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील हरयाणा भवनात झालेली ही बैठक तब्बल अडीच तास चालली. देशातील विविध समुदायांसोबत जवळीक साधण्याच्या संघाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.

या बैठकीत मौलवींनी मोहन भागवत यांच्याकडे समाजाचे प्रश्न मांडले. वक्फ बोर्डाच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली. वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मोठा आणि चांगला होता, असेही भागवत यावेळी म्हणाले. ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी या बैठकीला उपस्थित होते.

बिहार, आसाम व पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीनेही या बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीत मौलवींनी भाजपच्या संदर्भातही भागवत यांच्याकडे म्हणणे मांडले. ‘भाजपमध्ये जे कोणी मुस्लिम नेते आहेत, त्यांच्यावर मुस्लिम समाजाचा फार विश्वास नाही. समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारा एखादा मुस्लिम चेहरा आरएसएसने पुढे आणावा, अशी मागणी यावेळी मौलवींनी केली.