सामना अग्रलेख – जगाला ‘मोदी’ नकोत!

भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे. आता तर कॅनडातील ‘जी 7’ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले नाही. कॅनडा 15 ते 17 जूनला ‘जी 7’चे यजमानपद निभावीत आहे. त्यात जागतिक विषयांवर चर्चा होईल. रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा होईल. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, कॅनडा, जर्मनीचे चॅन्सलर या संमेलनात आहेत. ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि युक्रेनचे राष्ट्रपती, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही या संमेलनात आमंत्रित आहेत. या जागतिक शिखर संमेलनापासून भारताच्या पंतप्रधानांना दूर ठेवले. त्यांना आमंत्रण नाही. याचा सरळ संदेश आहे तो म्हणजे जगाला मोदी नको आहेत. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.

नरेंद्र मोदी हे आता विश्वगुरू बनले आहेत असा डंका पिटणाऱ्या अंधभक्तांनी चिंतन करावे अशा वार्ता समोर येत आहेत. जगभरातून भारताविरुद्ध वारे वाहत आहेत आणि पंतप्रधान मोदी मात्र बिहारात निवडणूक प्रचार सभांत गुंतले आहेत. विश्वगुरू मोदींची लंका जळत आहे व संपूर्ण भाजप चूप आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जागतिक वित्तीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. ‘एडीबी’ म्हणजेच आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला 80 कोटी डॉलरचे कर्ज मंजूर करून मोदी यांच्या विश्वगुरुत्वाची खिल्ली उडवली आहे. दोन दिवसांपूर्वी एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा हे पंतप्रधान मोदींना भेटले. दोघांत चर्चा झाली. ‘‘पाकिस्तानला आर्थिक मदत मिळाली तर तिचा दुरुपयोग होईल. ही रक्कम पुन्हा दहशतवाद पोसण्यासाठी वापरली जाईल,’’ असा विचार मोदींनी मसातो कांडा यांच्याकडे मांडला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मोदींचे बोलणे या कानाने ऐकले व दुसऱ्या कानाने सोडले असेच दिसते. मसातो कांडा यांनी पुढच्या दोन दिवसांत पाकिस्तानसाठी 6,861 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पाकिस्तान हा भिकारी, कंगाल, कर्जाखाली बुडालेला देश आहे असे भारताचे मंत्री रोज सांगतात, पण जागतिक स्तरावर पाकिस्तानला ही अशी भरघोस मदत होताना पाहून भारताची चिंता वाढू लागेल. रशियाने पाकिस्तानबरोबर नुकताच 2.6 बिलियन डॉलर्सच्या मेगा प्रोजेक्टवर सह्या केल्या हे तर धक्कादायक आहे. रशियासारखा भारताचा एकेकाळचा मित्र पाकिस्तानात औद्योगिक गुंतवणूक करून

पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या

सक्षम करत आहे. अझरबैजान, तुर्कस्तान, चीनदेखील तेच करत आहेत. पाकिस्तानला ‘एडीबी’ने दिलेले 6,861 हजार कोटींचे पॅकेज प्रे. ट्रम्प यांच्या संमतीनेच दिले. हे चित्र भारतासाठी धोकादायक आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची धुरा पाकिस्तानकडे देण्यात आली आहे. पाकिस्तान दहशतवाद पोसणारा देश आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा अशी मागणी घेऊन भारत संयुक्त राष्ट्रांत अनेकदा गेला, पण संयुक्त राष्ट्रांनी आता पाकड्यांनाच दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्ष केले. हा पंतप्रधान मोदींच्या विदेश नीतीचा सरळसरळ पराभव आहे. याशिवाय तालिबान प्रतिबंध समितीचे अध्यक्षपदही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला देऊ केले आहे. तालिबान प्रतिबंध समिती ही अफगाणिस्तानच्या शांती, स्थिरता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या व्यक्ती, गट व संस्थांची आर्थिक कोंडी करण्याबाबत निर्णय घेणारी अधिकृत समिती आहे. तालिबानच्या निर्मितीचे श्रेय पाकिस्तानकडे जाते. तालिबान, अल कायदा, हिजबुल या दहशतवादी संघटनांचे आश्रयदाते म्हणून पाकिस्तानकडे बोट दाखवले जाते. तरीही भारतीय धोरण आणि भावनांची पर्वा न करता पाकिस्तानला दहशतवादविरोधी लढाईचे नेतृत्व दिले. भारत आता काय करणार व पंतप्रधान मोदी हा धक्का कसा पचवणार? पाकिस्तानला भारताच्या बरोबरीत उभे करून सक्षम करण्याचा हा आंतरराष्ट्रीय डाव आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा वगैरे लोकांची धोरणे जागतिक स्तरावर भारताची मान खाली घालायला लावणारी आहेत. मोदी जागतिक व्यासपीठावर जातात ते स्वतःची ‘टामटुम’ करून घेण्यासाठी. मोदींबरोबर जागतिक नेते फोटो काढतात, मोदी पुढे चालतात व

जागतिक नेते

मोदींच्या पाठीमागून चालताना दाखवून भारतीय मीडिया जागतिक पातळीवर भारताला अडचणीत आणते. हे सर्व करून ‘विश्वगुरू’ म्हणून मोदींची प्रतिमा ही फक्त त्यांच्या अंध भगतगणांत आहे. जगात हे असे काहीच नाही. मोदींना प्रे. ट्रम्प यांनी शपथविधीला बोलावले नाही. मोदी ट्रम्प यांना भेटायला गेले तेव्हा भारतीय पंतप्रधानांचे सन्मानाने स्वागत करण्याचा साधा शिष्टाचार प्रे. ट्रम्प यांनी पाळला नाही व भारत-पाक युद्धात पंतप्रधान मोदींना विश्वासात न घेता प्रे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. हा एक प्रकारे सार्वभौम भारताचा अपमान आहे. मोदी यांचा हा असा अपमान जगात रोज होत आहे. पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवून मोदींनी 56 सभासदांचे एक शिष्टमंडळ जगात पाठवले, पण या शिष्टमंडळास कोणत्याही देशातील महत्त्वाचा नेता भेटला नाही. भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे. आता तर कॅनडातील ‘जी 7’ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले नाही. कॅनडा 15 ते 17 जूनला ‘जी 7’चे यजमानपद निभावीत आहे. त्यात जागतिक विषयांवर चर्चा होईल. रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा होईल. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, कॅनडा, जर्मनीचे चॅन्सलर या संमेलनात आहेत. ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि युक्रेनचे राष्ट्रपती, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही या संमेलनात आमंत्रित आहेत. या जागतिक शिखर संमेलनापासून भारताच्या पंतप्रधानांना दूर ठेवले. त्यांना आमंत्रण नाही. याचा सरळ संदेश आहे तो म्हणजे जगाला मोदी नको आहेत. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. मोदी-शहांनी भारताचा लौकिक धुळीस मिळवला आहे. अंधभक्तांना हे कधीच समजणार नाही.