हा तर निर्लज्जपणाचा कळस, भाजप नेत्याच्या विधानाचा संजय राऊतांनी घेतला समाचार

भाजप हा देशातला नव्हे तर जगातला निर्लज्ज पक्ष आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच 26 महिलांनी पहलगाममध्ये दहशदवाद्यांचा सामना करायला हवा होता असे विधान भाजप खासदार राम चंदर जांगरा यांनी केले होते. हे विधान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे असे म्हणत संजय राऊत यांनी समाचार घेतला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, ते टीम इंडिया म्हणून काम करत नाहियेत. कुणालाच विश्वासात घेत नाहियेत. भाजपचे मुख्यमंत्री सोडले तर विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले जात नाहिये. पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याचं सरळ सरळ राजकारण सुरू केलं आहे. निती आयोगाच्या बैठकीतसुद्धा ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. तसेच बिहार सारख्या राज्यामध्ये भाजपकडून पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होर्डिंग्ज लावले जातात यासाठी जबाबदार कोण? पहलगाम हल्ल्याचे राजकारण कोणी करू नये असे म्हणतात, ते आम्ही मान्य करू आणि पंतप्रधान लष्कराच्या गणवेशातले फोटो, होर्डिंग आणि टीव्हीवर जाहिराती करत आहातय. असे करून तुम्ही जे जवान शहीद झाले, ज्या महिलांचे कुंकू पुसले त्या महिलांचा अपमान करत आहात.

ऑपरेशन सिंदूर हे देशासाठी केलं आहे की भाजपसाठी? ऑपरेशन सिंदूरच्या नावाने तुम्ही सिंदूर यात्रा काढत आहात हे राजकारण नाही तर काय आहे? ही अतिशय घृणास्पद बाब आहे. ज्या अतिरेक्यांनी 26 महिलांचं कुंकू पुसलं ते अतिरेकी गायब झाले आहेत. ते दहशतवादी तुम्ही शोधू शकला नाहीत, पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान बरोबरच युद्ध थांबवलं आहे, आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या यात्रा काढत आहात.

ऑपरेशन सिंदूर हा जर अजेंडा असेल तर याचा अर्थ पुलवामा मध्ये जो संशय आम्हाला होता, ते ही आरोपी सापडलेले नाहीत. त्याचं राजकारण केलं आणि आता पहलगाममध्ये सुद्धा जे घडलं आहे त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का? असा संशय लोकांना येईल. तुम्ही राजकारणाच्या अजेंड्यावर ऑपरेशन सिंदूर हा घेतलाय. याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का? हा स्पष्ट एक संकेत पंतप्रधानांच्या कृतीतून दिसतोय, हे देशासाठी योग्य नाही. मुळात प्रेसिडेंट ट्रंम्पचा हस्तक्षेप या देशात वाढलेला आहे. सातत्याने त्याच्यावर पंतप्रधान बोलत आहेत. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांचे ऑपरेशन होतं. तुम्ही त्याचं श्रेय घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय. अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांनी आतापर्यंत केलं नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही एनडीए शासित मुख्यमंत्र्यांना बोलावून ऑपरेशन सिंदूरवर प्रचार करायला सांगता. या देशाला तीन सेनादल आहेत त्या तीन सेनादलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती त्यांच्याशी चर्चा केली का? तीन सेनादलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का? तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे. हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुढगे टेकायला लावले आहात, ते दुर्दैव आहे.

भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधान केले की त्या महिलांनी दहशतवाद्यांना विरोध नाही केला. त्या नेत्यांनी त्यांच्या घरातल्या महिलांना पाठवावं. त्या किती प्रतिकार करतात पाहूया. तुमच्या घरामध्ये उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार आहेत की त्यांच्यापुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहेत त्याचा खुलासा करा. तुम्ही आमच्या 26 महिलांच्या कुंकवाचा अपमान करताय त्यांनी काय करायला पाहिजे? मुळात जे हे बोलतायत त्यांनी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. ती वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची आलेली आहे. ते अमित शहांच्या अपयशामुळे आलेली आहे. देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे, त्यांच्यामुळे आमच्या 26 महिला विधवा झाल्या त्यांच कुंकू पुसल गेलं आणि तुम्ही महिलांना दोष देताय हा निर्लज्जपणाणा कळस आहे. ते स्वतः विषयी बोलतायत, स्वतः विषयी ज्या पद्धतीने त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोपोगंडा करायला सांगतायत त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाला परदेशात पाठवलं आणि देशामध्ये भाजप सिंदूर यात्रा काढत आहे. जिथे तुम्ही आमच्या 26 महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत, त्यांच्या नावाने तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करता, लक्षात घ्या इतका निर्लज्ज पक्ष या देशाच्या राजकारणातल्या जगाच्या राजकारणात झाला नाही. सिंदूर पुसलं गेलं याचे त्यांना काही नाही. सिंदूरच राजकारण त्यांना करायचं आहे. मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीने वारंवार सांगतोय, स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू लहान सहान किलमिष दूर करू मतभेद संपवून टाकू. हे जेव्हा आम्ही सांगतो त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे ते काय सांगताय आम्ही तयार आहोत. तुम्ही ते काल काय म्हणाले परवा काय बोलले याच्यात कशाला जाताय? तुम्ही पण मराठी आहात तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात महाराष्ट्राच्या कपाळावरचा सिंदूर हा मुंबई आहे, तो पुसण्याचा प्रयत्न होत आहे. आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढता आहेत. परंतू प्रत्येक क्षेत्रातल्या सगळ्या मराठी माणसाला हे वाटायला पाहिजे की मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. आम्ही भूतकाळात डोकावत नाही. भूतकाळाची थडगी उकरायचा कोणी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात. राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्या बरोबर चांगला नव्हता. पण आम्ही एकत्र आलो. अडीच तीन वर्ष सरकार चालवलं. लोकसभा निवडणुका एकत्र लढलो आम्हाला चांगलं यश आलं. विधानसभेला आम्हाला यश प्राप्त झालं नाही कारण निवडणुका हायजॅक केल्या. तरीही आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत या भविष्याच्या विचाराने आम्ही एकत्र आहोत. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं हे महाराष्ट्राच्या हिताच्या आणि सोईचं आहे. आम्ही त्या दिशेने पावल टाकलेली आहेत.

सुधीर मुनगंटीवार हे एक प्रगल्भ राजकारणी आहेत. महाराष्ट्रावर त्यांच प्रेम आहे, त्यांनी आमच्याबरोबर प्रदीर्घ काळ काम केलं, ते ज्येष्ठ नेते आहे. आताचे जे बाजारबुणगे आहेत त्यांना महाराष्ट्र माहित नाही. सुधीर भाऊ जे बोलतात ही त्यांची एक आतली मनापासूनची इच्छा आहे.ही प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे. मी वारंवार सांगतोय. ही जशी आमची भावना आहे, तशी सगळ्यांची आहे, उद्धव ठाकरे साहेबांची आहे. आमच्या पक्षामध्ये त्याच्यावर काही मतभेदच नाहीये, असू शकत नाही. पक्षप्रमुखांनी सूचना केलेल्या आहेत, आपल्याला सकारात्मक विचार करून सकारात्मक पावलं टाकायचे आहेत विषय संपला. आम्ही भूतकाळात डोकावत नाही, वर्तमान पाहत नाही, आम्ही भविष्यात पाहतो असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.