हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच वाचवताहेत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक हनी ट्रॅपच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हनी ट्रॅप प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जी उडवाउडवीची उत्तरं दिली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न शोभणारी आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात हनीपण नाही, ट्रॅपपण नाही. ते खोटं बोलताहेत. गृहखात्याने त्यांना चुकीची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसच त्यांना वाचवताहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

देशाच्या उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा का दिला? त्याची कारणं काय आहेत? या विषयी कोणतीही माहिती सरकारने ना सभागृहाला दिली, ना देशाच्या जनतेला दिली. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात. आपलं सभागृह हे हेडलेस आहे, असं कोणीतरी मला सांगितलं. सभागृहाला नेतृत्वच नाहीये, त्याच्यामुळे एक अराजक माजलेलं आहे. लोकं येतात गोंधळ, घालतात निघून जातात. आता कोण नेतृत्व करणार या विषयी सभागृहाला काही कल्पना नाही. उपराष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा काल अत्यंत रूक्ष पद्धतीने करण्यात आली. ही घोषणा कोणी करावी? तर उपसभापतींनीही केली नाही. तर उपसभापतींच्या पॅनेलवरील एका सदस्याने केली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कालपर्यंत जी व्यक्ती सभागृहाचं नेतृत्व करत होती, चेअरमन होती, उपराष्ट्रपती होती त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा निदान उपसभातींनी करायला हवी होती. पण उपसभापतींच्या पॅनेलवरील एका सदस्याने ती केली. याचा अर्थ पडद्यामागे भारतीय जनता पक्षामध्ये काही घडामोडी घडतायेत. आणि त्यातून हा राजीनामा झालेला आहे या विषयी कुठलीही शंका नाही, असे संजय राऊत म्हणाले.

“भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM सोबतचा फोटोही दाखवला

हनी ट्रॅपमध्ये माजी खासदार जे आमच्या पक्षात होते ते आणि सध्याच्या सरकारमधले चार विद्यमान मंत्री यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण देवेंद्र फडणवीस हे काही समजून घ्यायला तयार नाहीत. काल दिवसभर ते वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर जी फुलं उधळली जात होती त्यांचा वास घेण्यामध्ये बिझी होते. त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. पण राज्यातले प्रश्न तसेच आहेत. राज्याची बदनामी सुरू आहे त्याच्यावरती त्यांचं मत ते कधीच व्यक्त करत नाही. विशेषतः हनी ट्रॅपचा विषय गंभीर आहे. राज्याच्या मंत्र्यांना कोणीतरी कुठेतरी अडकवलं जातंय. यामध्ये राज्याची नैतिकता आणि त्या मंत्र्यांची नैतिकता पणाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती विधानसभेत जी उडवाउडवीची उत्तरं दिली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न शोभणारी आहेत. दिल्लीमध्ये कोणत्या जागा आहेत हे सगळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. रात्रीच्या काळोखात वेश पालटून ते एकनाथ शिंदेला भेटण्यासाठी फिरायचे, ते खिशामध्ये सीडी आणि पेनड्राइव्ह घेऊनच फिरत होते. आणि त्यानुसार आमदार, खासदारांच्या याद्या तयार झाल्या आणि त्यांना निरोप गेले… सुरतला जाता की सीडी लावू? हे आहेच ना, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

राज्यातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे आहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

आता हनी ट्रॅपच्या एका वेगळ्या प्रकरणामध्ये काही पोलीस धाडी मारताहेत. भाजपचे गिरीश महाजन किंवा फडणवीस यांच्या जवळचा एक माणूस अटकेत आहे. ही वेगळी केस आहे. त्यात अधिकारी असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातले एक मंत्री त्यामध्ये असू शकतात, असं म्हणतात. पण हनी ट्रॅप हा विषय आहेच. जे देवेंद्र फडणवीस म्हणतात हनीपण नाही, ट्रॅपपण नाही. ते खोटं बोलताहेत. गृहखात्याने त्यांना चुकीची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसच त्यांना वाचवताहेत. राज्यात चोरांना, भ्रष्टाचाऱ्यांना, व्यभिचाऱ्यांना वाचवण्याचं काम कोण करतंय? राज्याचा मुख्यमंत्री असतो तोच करतो, तो सर्वेसर्वा आहे. त्यांनी ठरवलं तर एका दिवसात हे सगळे तुरुंगात जातील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नगरविकास खात्यामध्ये लुटमार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू असेल तर अंतिमतः राज्याच्या सर्वच खात्यांचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. गेल्या काही काळामध्ये राज्याच्या रस्ते किंवा बांधकाम खात्यामध्ये समृद्ध महामार्ग असेल किंवा पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामं असतील त्याच्या सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे.