अजित पवारांची भूमिका लोकशाहीला छेद देणारी; आंदोलनं केली नाही तर सत्ताधारी माजतील! – संजय राऊत

अजित पवार यांची आंदोलनावरची भूमिका लोकशाहीला छेद देणारी आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षालाही स्थान आहे. विरोधी पक्षाने आंदोलने केली नाही तर सत्ताधारी माजतील, राज्य, देश लुटतील, महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर डाके टाकतील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

नुसते आंदोलन करून काही होत नाही, सत्तेत राहून लोकांची कामं करावी लागतात, असे विधान अजित पवार यांनी केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी आपला पक्षही आंदोलनातून उभा केला होता. शिवसेनेसारखा पक्ष एक आंदोलन आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले नसते किंवा अशी अनेक आंदोलने आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नसते. त्यामुळे आंदोलनाचा अपमान करू नका. सत्तेत राहून एकेकाळी लोकांची कामे करता येत होती, पण आजकाल सत्ता तिजोरी लुटायला वापरली जाते. यावर अजित पवारांइतके कुणी भाष्य करू शकत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात लुटमार केली आहे. आरोग्य, सामाजिक न्याय, महसूल, शिक्षण असा एकही विभाग नाही जिथे लूटमार केली नाही. मजबूत सत्ता असणाऱ्या मोदींनी जनतेची कोणती कामे मार्गी लावली हे त्यांनाच जाऊन विचारा. ‘एक अकेला सब पर भारी’, अशी सत्ता आहे, तरीही प्रे. ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरूद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला, असेही राऊत म्हणाले.

सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळात प्रचंड लुटमार केली, त्यांच्या चौकश्या सुरू झाल्यावर ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले असे जर कुणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वत:ची कातडी वाचवायची होती, स्वत:वरील कारवाया वाचवायच्या होत्या. बाकी जनतेची सेवा, महाराष्ट्राची सेवा वगैरे वगैरे हे सगळे ढोंग आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

एका ताटात जेवलो हे कधीही विसरणार नाही! सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात अनियमितता आढळील आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावी. कारण लोकांची कामे करता यावी म्हणून सत्ता हवी असे ते म्हणाले होते. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे संजय राठोड एक सहकारी आहेत. त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, दरोडे टाकले यावरती अजित पवार यांनी महाराष्ट्राला प्रवचन दिले पाहिजे.

फुटीची चिंता करू नका, काही फरक पडत नाही! शरद पवारांचे उद्गार