पालकमंत्रीच काय, सरकारवाचूनही जनतेचे काही अडलेले नाही, संजय राऊत यांचा फडणवीस यांना टोला

पालकमंत्र्यांशिवाय नाशिकचे काही अडलेले नाही, हे मुख्यमंत्री योग्यच बोलले. मूळात मंत्री कामच करीत नसल्याने मंत्रिमंडळावाचूनही अडलेले नाही. मुख्यमंत्री नसले तरी राज्य चालतंय, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला निष्क्रियतेवरून फटकारले.

नाशिक येथे सोमवारी खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शहरांची दुरवस्था, जनतेबद्दलची अनास्था, भ्रष्ट कारभारावरून सरकारला लक्ष्य केले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ते म्हणाले की, एकाही मंत्र्याला राज्याचे प्रश्न समजलेले नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं, लोकांना वाटणं, पक्ष फोडणं एवढंच करताय. आजही ते लग्नसोहळ्यांतच अडकले आहेत, अशी टीका केली. राज्यात आणि केंद्रातही राज्यमंत्र्यांबरोबरच कॅबिनेट मंत्र्यांनाही अधिकार नाहीत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, केशव पोरजे, राहुल दराडे, मसूद जिलानी, शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते.

कुंभमेळ्याची कामे गुजराती ठेकेदारांनाच

नाशिक कुंभमेळ्यासाठीच्या साडेसहा हजार कोटींपैकी प्रत्यक्ष किती कामे होतील, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. प्रयागराजमध्ये तंबू, वाहतूक, नौकावाले असे सगळेच ठेकेदार गुजरातचे होते. नाशिकमध्येही स्थानिकांना कंत्राट मिळणार नाहीत. सगळीच कामे आणि हजारो कोटीतले किमान पाच ते दहा हजार कोटी गुजराती ठेकेदारांनाच जातील, अशा शब्दांत सरकारचे गुजरातधार्जिणे धोरण उघड केले.