
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधिलिया ।।
हरि मुखें ह्यणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं ।।
पुण्यनगरीत जणू ‘पंढरी’च अवतरली आहे. शहराच्या पेठा-पेठांमधून ‘माउली… माउली… हरि मुखे म्हणा… जय हरि विठ्ठल…’ असे शब्द ऐकू येताहेत. अर्थातच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी आल्या आहेत. कितीही धावपळ असली, कामाची लगबग असली, तरी पालखीस्थळाला भेट देऊन दोन्ही पालख्यांच्या दर्शनावेळी हात जोडून नतमस्तक होताना पुणेकर दिसत आहेत. जागतिक योगदिनाचे औचित्य साधत वारकऱ्यांनी योग प्रात्यक्षिके, ओंकार आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’ असा जयघोष करीत भक्तियोगाचे दर्शन घडविले.
शहरात जागोजागी भजन-कीर्तन, प्रवचन करताना वारकरी दिसत होते, तर योगदिनानिमित्त काही ठिकाणी सूर्यनमस्कार, योगासनांच्या प्रात्यकक्षिकांमध्ये वारकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले. वारकऱ्यांप्रमाणे पायी चालण्याचा संकल्प करून काहींनी अनोखा योगदिन साजरा केला. नाना पेठ, भवानी पेठ, शुक्रवार पेठ अशा सर्व परिसरात वारकऱ्यांची, त्यांना सेवा देणाऱ्या सेवार्थीची लगबग सकाळपासूनच सुरू होती. शनिवारी आणि रविवारी आलेल्या जोडून सुट्टयांमुळे नोकरदारवर्गही वारी अनुभवत होते. राज्याच्या कानकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांची सर्वजण काळजी घेताना दिसत होते. नाश्ता, जे-वण, फळे, चहा, पिशव्या, रेनकोटचे मोफत वाटप सुरू होते. कोणी वारकऱ्यांना मोफत पुणे दर्शन घडवीत होते. काहीजण उद्या पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारीबरोबर पायी चालणार आहेत. ‘पर्यावरण दिंडी’, ‘आरोग्य दिंडी’, ‘स्वच्छतादूत दिंडी’, ‘आयटी दिंडी’च्या माध्यमातून सेवाभाव जपत वारीत सहभागी झालेले दिसत होते.
शहराच्या चौकाचौकांत वारकऱ्यांची, पुणेकरांची गर्दी दिसत आहे. जमेल तेथे वारकऱ्यांनी आसरा घेतलेला दिसत आहे. काहींनी दिंडीसोबत आणलेल्या ट्रक, टेम्पो अशा वाहनांत आराम केला. अन्नदान, हातापायांना मॉलिश, मोफत चप्पल शिवणे अशा सेवा दिवसभर सुरू होत्या. काही ठिकाणी विद्यार्थीही वारकऱ्यांची सेवा करताना दिसत होते. वयस्कर आजी-आजोबांना चहा देणे, रस्ता ओलांडून देणे… असे मदतकार्य शनिवारी सुरू होते.
सायंकाळी पावसाने काहीशी उघडीप देताच वारकरी सारसबाग, तुळशीबाग, शनिवारवाडा या परिसरांना भेट देताना दिसत होते. कोणी मेट्रोमधून प्रवास करीत होते.
‘देहू इंजिनीअरिंग ‘तर्फे वारकऱ्यांची सेवा
‘देहू इंजिनीअरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे दोन हजार वारकऱ्यांना फळे, चहा, पाणी बॉटल, बिस्कीट, फुटीचे वाटप करण्यात आले. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत कंपनीतील सर्व कामगारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, असे आकाश ज्योती, दीपक महालपुरे यांनी सांगितले.
विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांनी पुणेकरांकडून अनोखी सेवा दिवसभर अनुभवली. काही ठिकाणी वारकऱ्यांना आपल्या कुटुंबीयांशी बोलता यावे यासाठी काही मोबाईल कंपन्यांनी मोफत डेटा पॅक देण्याची व्यवस्था केली होती. भाजप प्रभाग क्रमांक 28 आणि एकता सेवा प्रतिष्ठानतर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घोरपडी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे नाश्ता, महाप्रसादाचे वाटप, तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी केले होते. भूमी सेवा संस्थेतर्फे संचालिका मृणाल घाटे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र रावळ समाज ट्रस्टतर्फे भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते, संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार यावेळी उपस्थित होत्या. ‘अभिनव कलाभ् पारती’ संस्थेतर्फे वारकऱ्यांचे पाय दाबून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रास्ता पेठ येथील कृष्णाई युवा मंचातर्फे वारकऱ्यांना डोसा, तेल, साबण आदींचे माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग सेलतर्फे चहा, राजगिरा लाडू, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप, उपाध्यक्ष अभिजित शहा, काँग्रेसचे लहू जावळेकर यांनी केळी, लाडूंचे वाटप केले. ‘पीएमटी’चे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे, ‘श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुप’तर्फे पोहे, बिस्कीट, ग्लासवाटप, आमदार हेमंत रासने, कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानतर्फे नाश्ता, फराळवाटप प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सुवर्णा भरेकर, पायल तिवारी, ‘बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गैंग’तर्फे संगीता तिवारी, पुनमित तिवारी, पोलीसमित्र संघटनेतर्फे पाणी बाटली, फराळवाटप, अध्यक्ष राजेंद्र कपोते, बहुजन विकास आघाडीतर्फे राजगिरा लाटूवाटप, आघाडीचे अध्यक्ष धनंजय घोलप, ‘सोनाली ग्रुप’तर्फे गरजेच्या वस्तूंचे वाटप, ग्रुपचे प्रमुख दत्तात्रय उभे, रुक्मिणीचंद प्रभू यांच्या हस्ते क-रण्यात आले. भारतीय अल्पसंख्याक संघटनेतर्फे रेनकोटवाटप, अन्नदान करण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम, फळेवाटप, पोहे-चहावाटप, दैनंदिन गरजेचे साहित्य, रेनकोट, चष्मेवाटप यांसह अन्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून शहरातील सामाजिक संस्था-संघटनांनी वारकऱ्यांची सेवा केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण असून, भजन-कीर्तनासह हरिनामाच्या गजराने शहरातील प्रमुख पेठा गजबजल्या आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील विविध भागांत सकाळपासून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.