
भक्तांवर अपार माया करणाऱया सावळ्या परब्रह्माचे दर्शन म्हणजे त्रिभुवनातील सर्वोच्च आनंद… ही आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष करीत निघालेल्या हजारो वारकऱयांच्या पावलांनी वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडून महानिर्वाणी आखाडय़ात दिंडीचा पहिला मुक्काम होता. एकूण 27 दिवसांत 453 किलोमीटर प्रवास करून हा भक्तिसागर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला 5 जुलै रोजी पंढरपुरी पोहोचणार आहे.