
राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून शुक्रवारी सायंकाळी सात शेळ्यांचा फडशा पाडला. येवले आखाडा, राहुरी सुत गिरणी परिसरात ही घटना घडली. राखणदार म्हणून राहणाऱ्या माणिक आसरु सोनटक्के उर्फ माळीबाबा यांच्या राहत्या घरी त्यांच्या मालकीच्या एकूण सात जनावरांवर हल्ला करत पाच शेळ्या व दोन बोकड ठार केले.
शेळ्यांचा आरडाओरडा ऐकून धावले असता बिबट्याने माळी बाबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एक शेळी घेऊन पळ काढला. त्यावेळी मदतीस आलेले आकाश हारदे यांनी स्थानिक नगरसेवक, वन विभाग अधिकारी आणि तहसीलदारांना फोन करून घटनेची माहिती दिली. वनविभाग अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्यांना पाठवून तात्काळ पंचनामा केला.
माळी बाबा यांचे कमीत कमी लाख ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी तहसीलदार तसेच वनविभाग अधिकारी यांनी माळीबाबा यांना 45 दिवसांच्या आत पूर्णपणे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.