
शिवडी-वरळी उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उर्वरित काम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी आणि शिवडी दरम्यानचा प्रवास अधिक जलद होईल. तसेच वरळी ते अटल सेतू प्रवासात वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.
शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वरळी येथून जाणाऱया शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळणेबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी झालेल्या चर्चेत कॉंग्रेस आमदार भाई जगताप, शिवसेना आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.
या रस्त्याच्या कामामुळे 83 कुटुंबे बाधित होत असून त्यांचे पुनर्वसन 3 किलोमीटरच्या परिसरात केले जावे असा आग्रह शिवसेना आमदारांनी यावेळी धरला. त्यांचे पुनर्वसन म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱया सदनिकांमध्ये करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

























































