चेंबूरच्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचा निर्णय रद्द करा! शिवसेनेची शिक्षण विभागाकडे मागणी

चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीने कलेक्टर कॉलनी येथील पाचवी ते दहावीचे वर्ग सिंधी सोसायटीमधील इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे 700 विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य यावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर सोयीसुविधांवर ताण वाढून त्याचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना होऊ शकतो. त्यामुळे तातडीने कलेक्टर कॉलनीतील विद्यार्थ्यांचे सिंधी सोसायटी येथील इमारतीमध्ये होणारे स्थलांतर थांबवावे, तसे लेखी आदेश शिक्षण विभागाने विवेकानंद एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापनाला द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी चेंबूर येथील शिक्षण निरीक्षकांची भेट घेऊन केली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावेळी मोठय़ा संख्येने पालकही उपस्थित होते.

कलेक्टर कॉलनी आणि सिंधी सोसायटीतील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या इमारतीमध्ये प्राथमिक व माध्यमिक व इतर विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळा व्यवस्थापनाने अचानकपणे पाचवी ते दहावीतील पालकांना नोटीस काढून 2025-2026 या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जून महिन्यापासून कलेक्टर कॉलनीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर सिंधी सोसायटीमधील इमारतीमध्ये करणार असल्याचे कळवले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधून संस्थेच्या व्यवस्थापनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

शिक्षक भरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र द्या!

संस्थेच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेताना शिक्षण विभागाकडे बोट दाखवले आहे. 1991 मधील अतिवृष्टीत कागदपत्रे भिजून खराब झाली व त्याची माहिती त्याच वर्षी शिक्षण कार्यालयाला दिली गेल्यानंतरसुद्धा शिक्षक भरतीमध्ये शिक्षण विभाग हरकत घेत आहे, असा आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसंदर्भात संस्थेला ना हरकत द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.