
धुळे जिह्यातील दोंडाईचा येथील पै. दादासाहेब रावल जनता सहकारी बँकेत अफरातफरी करणारे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संजय राऊत यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे. दोंडाईचा येथील पै. दादासाहेब रावल जनता सहकारी बँकेतून मंत्री जयकुमार रावल यांनी 98 कोटींचे कर्ज विनागॅरेंटी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना वाटले. इतकेच नव्हे तर बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर गुजरातमधील नातेवाईकांनाही कोट्यवधी रुपये दिले. परंतु राजकीय दबावापोटी या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास झाला नाही, असे संजय राऊत यांनी या पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झाली व चौकशी अहवालानुसार मंत्री जयकुमार रावल हे बँक घोटाळा प्रकरणात आरोपी क्रमांक तीन आहेत. अटक होऊ नये म्हणून रावल हे इतर 55 आरोपींसह फरार झाले होते. त्याच काळात यातील काही आरोपींनी ‘एसआयटी’ तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तपास सीआयडीकडे सोपवण्यास आपणास भाग पाडले होते, असे संजय राऊत यांनी पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
माजी राष्ट्रपतींनाही गंडवले
जनतेच्या पैशांची लूट करून सत्ता भोगणे हा भयंकर अपराध असून रावल यांचे वर्तन लोकप्रतिनिधीस शोभणारे नाही. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने कोणता आदर्श बाळगावा? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपण्याचा रावल यांचा प्रयत्नही उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. सामान्य जनतेला आणि राष्ट्रपतींनाही सोडले नाही याचे इनाम म्हणून रावल महाशय मंत्रीपदी आहेत काय? असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
ईडीमार्फत तपास करा
मुंबईतील पीएमसी बँकेतील घोटाळ्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे सोपवण्यात आला होता. जयकुमार रावल यांनी ‘रावल’ बँकेत केलेला गुन्हाही त्याच पद्धतीचा आहे. रावल यांनी बँकेच्या पैशांची अफरातफर करून ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत येणारा मनी लॉण्डरिंगचा गुन्हा केल्याने हे संपूर्ण प्रकरण निष्पक्ष तपासासाठी ‘ईडी’कडे सोपवण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.