संघात येण्यासाठी श्रेयसने आणखी काय करावे? हरभजन सिंगला पडला प्रश्न

रणजी ट्रॉफीत धावा केल्या. आयपीएलमध्येही धावांचा पाऊस पाडला. संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस अय्यरसारखा फलंदाज संघात असायला हवा होता. पण तो संघात नाही, त्याचे राहून राहून आश्चर्य वाटतेय. जेव्हा एखादा खेळाडू फॉर्मात असतो तेव्हाच त्याला संधी मिळायला हवी, मात्र त्याला संधी देण्यात वेळ का लावला जात आहे याची कल्पना नाही. बहुधा निवड समिती त्याच्याबाबत आणखी वेगळा विचार करत असावी. त्याने आणखी काय करायला हवे की, त्याला संघात स्थान मिळेल, असा प्रश्न  हिंदुस्थानचा महान फिरकीवीर हरभजन सिंगला पडलाय.

आयपीएलची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी खेळणारा श्रेयस अय्यर गेली दोन वर्षे कसोटी संघाबाहेर आहे. सध्या त्याला वन डेचे नेतृत्व दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्याला कसोटी संघापासून दूरही ठेवले जातेय. याबाबत सर्वांप्रमाणे हरभजन सिंगलाही आश्चर्य वाटतेय. हिंदुस्थानी संघात येण्यासाठी जे करायला हवे, ते सर्वकाही श्रेयस गेले वर्षभर करतोय. त्याने आणखी किती चांगले खेळायला हवे हेसुद्धा मला नीट कळत नाहीय. देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत सर्व ठिकाणी त्याने स्वतःला सिद्ध केलेय. जेव्हा संधी मिळाली त्याचे त्याने   सोने केलेय. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो चांगला खेळला. तरीही त्याचा करार रद्द करण्यात आला. त्याचे खरे कारण काय आहे, याची कल्पना नाही. या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याने मॅचविनिंग खेळी केल्या. मग त्याला पुन्हा करारबद्ध करण्यात आले. आता तर त्याने आपल्या जोरावर पंजाबला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवले. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी मिळायलाच हवी होती, असेही हरभजन सिंग म्हणाला. पण त्याचबरोबर तो लवकरच हिंदुस्थानच्या कसोटी संघात दिसेल, असा विश्वासही बोलून दाखवला.