रोहित नव्हे श्रेयस कर्णधार? हिंदुस्थानी वन डे संघाच्या नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू

गेल्या महिन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. तेव्हा त्यांनी आपण एकदिवसीय क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर केले होते. दोघांनाही आगामी वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळायचे असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना धक्का देण्याचा बीसीसीआयने प्लॅन आखल्याचे समोर आले आहे. त्यानुसार वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडून काढून घेत मुंबईकर श्रेयस अय्यरकडे सोपविले जाणार असल्याच्या चर्चांनाही अचानक उधाण आले आहे. मात्र या वृत्ताला कोणत्याही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघ जाहीर होण्यापूर्वी रोहित आणि विराटने आपली कसोटी निवृत्ती जाहीर केली होती. या निवृत्तीमुळे बीसीसीआय रोहित आणि विराटच्या कोणत्याही मागण्यांना मान्य करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही आगामी 2027 च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याचे ध्येय या दोघांनी समोर ठेवले आहे. मात्र रोहितचा सध्याचा फिटनेस पाहता तो 2027 पर्यंत वन डे संघात फिट बसणे कठीण मानले जात आहे. तरीही त्याला संघात कायम ठेवले तरी त्याच्याकडून वन डे नेतृत्व काढून घेत संघाला नवा कर्णधार देण्याची रणनीती बीसीसीआयने आखली असल्याचे समोर आलेय. त्यानुसार आयपीएल गाजवणाऱ्या श्रेयस अय्यरला बक्षीस म्हणून रोहितकडे असलेले नेतृत्व दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. श्रेयस सध्या वन डे संघात कायम आहे. मात्र आयपीएलमधील त्याच्या कामगिरीकडे कुणीही कानाडोळा करू शकत नाही. त्यामुळे तो लवकरच टी-20 च नव्हे तर कसोटी क्रिकेटपासूनही फार काळ दूर राहू शकत नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त श्रेयस आता लवकरच नव्या रूपात आणि नव्या ताकदीनिशी संघाचा भाग होऊ शकतो. यासाठी किती काळ त्याला प्रतीक्षा करावी लागेल, याचे उत्तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मिळू शकते.

नवा वर्ल्ड कप, नवा कर्णधार

गेल्याच अडीच दशकांपासून हिंदुस्थानी संघाला प्रत्येक वन डे वर्ल्ड कपमध्ये नवा कर्णधार लाभत आहे. पहिले दोन वर्ल्ड कप श्रीनिवास वेंकटराघवन (1975, 1979), मग पुढचे दोन वर्ल्ड कप कपिल देव (1983, 1987), त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन (1992, 1996, 1999) यांनी संघाचे नेतृत्व सांभाळले. मात्र त्यानंतर प्रत्येक वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व नव्या कर्णधाराकडे दिले जात आहे. त्यानुसार सौरभ गांगुली (2003), राहुल द्रविड (2007), महेंद्रसिंग धोनी (2011, 2015), विराट कोहली (2019) आणि रोहित शर्मा (2023) हे कर्णधार लाभले. 2011 चा वर्ल्ड कप धोनीने जिंकल्यामुळे 2015 नेतृत्वही त्यानेच सांभाळले होते. किमान दोन वर्षे आधी संघाला नवे नेतृत्व देण्याची पद्धत असते. त्यावरून हिंदुस्थानी वन डे संघालाही या वर्षी श्रेयसच्या रूपाने नवा कर्णधार लाभू शकतो.