Sindhudurg News – अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी, खरीप हंगामातील भात  पिक नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, फळपिक विम्याचे टिगर जाहीर करावेत, खतांचा पुरवठा सुरळीत करावा, त्याचबरोबर अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अकरावीचे वर्ग सुरु करण्याची कार्यवाही करावी अशा मागण्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन केल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून सबंधित मागण्यांवर  अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.

शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची देखील भेट घेऊन साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली. राज्य शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली मात्र ग्रामीण भागात प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच करावी. त्याचबरोबर नवीन अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला केवळ 10 टक्के इन हाऊस कोट्याची घातलेली अट रद्द करावी. ओबीसी ,व्हीजे, एनटी,एसबीसी ,एसईबीसी , इडब्ल्यूएस या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर अनिवार्य केल्याची अट रद्द करावी आणि अकरावीचे शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर सुरू करावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असे म्हटले आहे.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,डिगस सरपंच सौ. पवार,मंदार खोटावळे,श्री सावंत उपस्थित होते.