एसटी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता, एक कोटी अपघात विमा; निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवास पास

ST-bus-Logo

एसटी महामंडळातील कर्मचाऱयांना जून महिन्यापासून मूळ वेतनावर 46 टक्क्यांऐवजी 53 टक्के महागाई भत्ता मिळणार असून एक कोटी रुपयांचे अपघात विमा कवचही देण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली. वैद्यकीय उपचारांच्या प्रतिपूर्तीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक पर्याय कर्मचाऱयांना निवडावा लागणार आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱयांना नऊ महिन्यांऐवजी 12 महिन्यांसाठी मोफत प्रवास पास देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात शासनाकडून ही माहिती देण्यात आली. एसटी कर्मचाऱयांना स्टेट बँकेमार्फत अपघात विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱयांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहे अशा कर्मचाऱयांना कामगिरीवर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे.