
>>रेश्मा शिवडेकर
नॉर्मलायझेशनच्या आधारे नीट-पीजी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मनमानीपणाचा ठरवून रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जेईई मेन, एमएचटी-सीईटी, सीयूईटी, कॅटसह बँक, पोलीस भरतीसाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळय़ा सत्रात होणाऱ्या असंख्य सीईटी, चाचणी परीक्षांच्या स्वरूपाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या बहुतांश परीक्षा वेगवेगळय़ा दिवशी, सत्रांमध्ये भिन्न भिन्न प्रश्नपत्रिकांच्या आधारे घेतल्या जात असून निकाल तयार करताना सर्रास सामान्यीकरणाचे (नॉर्मलायझेशन) सूत्र वापरले जाते. मात्र हे सूत्र नियमित परीक्षांकरिता नसून अपवादात्मक परिस्थितीतच वापरले जावे, असे स्पष्ट करत नीट-पीजी दोन सत्रांमध्ये घेण्याचा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला.
दोन सत्रांमधील प्रश्नपत्रिका कधीही समान काठीण्य पातळीच्या असू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना समान पातळीवर संधी मिळत नसल्याने हा निर्णय मनमानीपणाचा असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांना अंतिम आणि मार्गदर्शक तत्त्व (प्रीसिडंट) म्हणून पाहिले जाते. त्यामुळे निकालातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अन्य सीईटीही एकाच दिवशी एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे घेणे बंधनकारक ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयाचे अॅड. उदय वारुंजीकर यांच्या मते, तांत्रिकदृष्टय़ा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल इतर परीक्षांनाही लागू आहे, परंतु प्रत्येक परीक्षेचा फॉरमॅट वेगळा असतो. त्यामुळे सरसकट सर्वच परीक्षांबाबत तो लागू होईल का हे त्या परीक्षेच्या स्वरूपावर ठरेल.
गुणांचे सामान्यीकरण म्हणजे काय…
अनेक सत्रांमध्ये वेगवेगळय़ा प्रश्नपत्रिकांच्या आधारे परीक्षा घेतली जाते तेव्हा निष्पक्षपणे गुण मिळावे याकरिता ही पद्धत वापरतात. कारण काही सत्रात सोपे तर काहींमध्ये कठीण प्रश्न असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते. त्यावर सामान्यीकरणाचा उपाय योजला जातो. भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य पातळीतील फरकांचा विचार करून एकूणच विद्यार्थ्यांची कामगिरी तपासली जाते. सामान्यीकरण ही एक सांख्यिकीय पद्धत आहे. यात प्रत्येक सत्रातील विद्यार्थ्यांचे गुण पर्सेंटाईल पद्धतीने काढले जातात आणि एकूण निकाल लावला जातो.
सामान्यीकरणाचे सूत्र योग्य हवे
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या जेईई-मेनला देशभरातून 12 ते 13 लाख विद्यार्थी बसतात, तर राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटीला दरवर्षी साधारण सात ते आठ लाख विद्यार्थी बसतात. लाखो विद्यार्थ्यांची एकाचवेळी ऑनलाईन परीक्षा घेणे हा मोठा टास्क असतो. एकाच वेळी परीक्षा घेतल्याने पेपरफुटीसारखे गैरप्रकार घडण्याचा धोका असतो हे नीट-पीजीच्या गेल्या वर्षीच्या गोंधळावरून दिसून आले. त्यामुळे वेगवेगळय़ा दिवशी परीक्षा घेऊन सामान्यीकरणाद्वारे निकाल लावणे सोपे होते. मात्र हे सूत्र योग्य आणि पारदर्शक असायला हवे, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.