
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणे किंवा त्यांचा अवमान करणे शिक्षकांना महागात पडणार आहे. मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत नियमावली लागू केली आहे. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यात स्पष्ट करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 2021 च्या ‘शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां’वर हे नियम आधारित आहेत. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यात निश्चित करण्यात आली आहे. शाळेत अनुचित घटना घडल्यास दोन दिवसांत अहवाल देणे बंधनकारक शाळेत कोणतीही अनुचित घटना घडली तर मुख्याध्यापकांना तातडीने दखल घेऊन दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. घटनेशी संबंधित सर्व पुरावे, मुलांच्या हजेरीची नोंद, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी चौकशीसाठी जपून ठेवावे लागतील. लैंगिक छळाशी संबंधित घटनेची 24 तासांत तक्रार लैंगिक छळाशी संबंधित घटना घडली असेल तर ‘पोक्सो’ कायदा आणि बाल न्याय कायद्यानुसार 24 तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.
कोणत्याही मारहाणीस मनाई
शाळेत शिक्षकांना मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण करता येणार नाही. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे यास मनाई आहे. त्याचबरोबर वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही. नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या या नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली तर संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे. एखादे वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली तर शिक्षण अधिकाऱयांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.






























































