EC ने जाहीर करण्याआधीच भाजप आयटी सेलला निवडणुकीची तारीख माहित असते, तेजस्वी यादव यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील (ECI) गंभीर आरोपांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व संवैधानिक संस्थांचे “अपहरण” केले आहे. विशेषत: निवडणूक आयोगावर निशाणा साधताना तेजस्वी यांनी दावा केला की, “निवडणूक आयोगाने निवडणूक तारखा जाहीर करण्यापूर्वीच भाजपाच्या आयटी सेलला त्या माहिती असतात.” माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी अलीकडेच एका लेखात 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता असल्याचा दावा केला, ज्यामध्ये बनावट मतदार यादी तयार करणे, मतमोजणीला उशीर करणे आणि पुरावे लपवणे यांचा समावेश आहे. राहुल यांनी म्हटले की, हीच पद्धत आता बिहारसह इतर राज्यांमध्ये, जिथे भाजपा कमकुवत आहे, तिथे वापरली जाऊ शकते.

तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांच्या या दाव्यांना पाठिंबा देताना 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले की, “2020 च्या निवडणुकीत मतमोजणी संध्याकाळी थांबवण्यात आली आणि रात्री पुन्हा सुरू झाली. जे उमेदवार विजयी घोषित झाले होते, त्यांना नंतर पराभूत घोषित करण्यात आले.” त्यांनी निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “आयोगाने पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे. जर संवैधानिक संस्था प्रभावाखाली काम करत असतील, तर न्याय मिळणे अशक्य आहे.”