
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आता शहरातील बेकायदा बांधकामांचे वीज आणि पाणी तोडण्यात येणार असून तसे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या कारवाईसाठी नऊ प्रभाग समित्यांमध्ये विशेष पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे बिल्डर लॉबीचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंब्रा शीळ भागातील 17 बेकायदा इमारतींच्या बांधकामांवर कारवाईची नामुष्की ओढावलेले ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कारवाईत ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करावे आणि सर्वेक्षणानंतर या बांधकामांवर कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी पालिकेच्या शहर विकास विभाग आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी नेमलेली विशेष पथके ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर २४ तास वॉच ठेवणार आहेत.
आजपासून कारवाईला सुरुवात
महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितींतर्गत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या पथकांनी आजपासून बेकायदा इमारतींच्या बांधकामांचे सर्वेक्षण व कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान पथकांच्या संख्येत आवश्यकता भासल्यास वाढ करावी, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.