
राजस्थानात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडत असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सिरोही जिह्यात दिल्ली-गुजरात राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. राज्यात आतापर्यंत तिघांचा पुरामुळे मृत्यू झाला असून अनेक जिह्यांमध्ये हाहाकार माजल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशच्या चित्रकूट जिह्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, तर गुजरातच्या उत्तरेकडील जिह्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. आज सकाळी अवघ्या 2 तासांत अमीरगढमध्ये तब्बल 101.6 मिमी इतका पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्येने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.