एपीएमसीमधील वशिल्यांच्या तट्टूंसाठी 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार रद्द; संचालकांचा प्रशासनावर दबाव

नवी मुंबईतील एपीएमसी प्रशासनाने केलेल्या 60 कर्मचाऱ्यांच्या होलसेल बदल्या रद्द करण्यासाठी संचालक मंडळाने सचिवांवर प्रचंड दबाव आणला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत या बदल्यांवरून जोरदार खडाजंगी झाली. मर्जीतील वशिल्याच्या तडूंना चांगली पोस्टिंग न मिळाल्याने अनेक संचालकांनी आदळआपट करून ही बदली प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाल्यानंतर काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत, तर मात्र काहींनी अद्याप जुनी जागा सोडलेली नाही.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटचे संचालक पी. एल. खंडागळे यांनी महिनाभरापूर्वी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या होलसेल बदल्या केल्या. फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, भुसार आणि मसाला मार्केटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात आणले तर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या पाचही मार्केटमध्ये पाठवले. त्यापैकी ज्यांच्या बदल्या मुख्यालयातून मार्केटमध्ये झाल्या आहेत, त्यांनी लगेच आपला पदभार स्वीकारला. मात्र मार्केटमधून मुख्यालयात बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी जाण्यास आढेवेढे घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत याच बदल्यांवरून मोठी खडाजंगी झाली. या बदल्या नियमानुसार नसल्याचा कांगावा करीत संचालकांनी सर्वच बदल्या रद्द करण्याची मागणी एपीएमसीचे सभापती प्रभू पाटील यांच्याकडे केली. या सभेला एपीएमसीचे संचालक पी. एल. खंडागळे हे उपस्थित नव्हते.

काही जणांची अडचण
प्रशासनाने केलेल्या बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांची अडचण आहे. त्यावर संचालक मंडळाच्या सभेत चर्चा झाली. येत्या सोमवारी पुन्हा संचालक मंडळाची सभा होणार आहे. त्यावेळी याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे सभापती प्रभू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

निर्णय रद्द केलेला नाही
एपीएमसी प्रशासनाने ६० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना शासनाचे सर्व निकष तंतोतंत पाळले आहेत. त्यामुळे अद्याप ही बदली प्रक्रिया रद्द करण्यात आलेली नाही. संचालक मंडळाच्या सभेत या विषयावर चर्चा झाली. त्या सभेला मी उपस्थित नव्हतो, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक पी. एल. खंडागळे यांनी व्यक्त केली आहे.