
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने दिंड्या घेऊन निघाले आहेत. पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला अनुदान देण्याची घोषणा मागील वर्षी सरकारकडून करण्यात आली होती. 6 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीला निघालेल्या प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांकडून 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर 20,000 रुपये प्रति दिंडी या हिशेबाने एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
पालखी मार्गावर ड्रोनच्या सहाय्याने देखरेख
आषाढी वारीच्या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 6000 पोलीस कर्मचारी, 3200 होमगार्ड, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या सहाय्याने देखरेख ठेवली जाणार असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.