शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग, दोन आरोपींना 6 महिन्याचा तुरुंगवास

शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शिवाजी अडसुळे (31) आणि विजय भागवत लोहार (34) आशी या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नराधम शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास द्यायचे. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

दरम्यान, लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात कलम 354(ड) भादंवी प्रमाणे आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी रु. 5000/- दंड ठोठावला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे व मदतनीस पोलिस अंमलदार तसेच कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख, कोर्ट ड्युटी महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांनी यासाठी मदत केली.