कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचे काम सुरूच राहील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्ती, सरकारला अस्थिर करण्यासाठी विरोधकांकडून आखले जाणारे डावपेच या सर्वांचा सामना करीत महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षांत राज्यातील जनतेने सरकारला आपले मानून केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले आहेत. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या, पण आम्ही विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचे काम अखंड सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला उद्या रविवार, 28 नोव्हेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून दिलेल्या संदेशात प्रशासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचे राज्याच्या वाटचालीतले योगदान तितकेच महत्त्वाचे आहे असे सांगून त्यांनाही धन्यवाद दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत शासन आणि प्रशासनात कुठेही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले, पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणला. तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असे पाहिले.

संकटाचे संधीत रूपांतर केले

सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटाने, नियोजनबद्ध रीतीने मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱया या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता आपल्या सरकारने वेगवेगळ्या आघाडय़ांवर अधिक जोमाने काम करायला सुरुवात केली. संकटाचे संधीत रूपांतर केले हे आपण सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठय़ा प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महानगरांच्या दळणवळणासाठी क्रांतिकारी पाऊल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही आम्ही लवकरच खुला करणार आहोत. राज्यात विविध शहरांना हवाई सेवेने जोडण्याचे नियोजन आहे. रस्ते, मेट्रो मार्ग यांचे इतके भक्कम आणि दर्जेदार जाळे राज्यात असणार आहे की गतिमान महाराष्ट्राची नवीन ओळख त्यातून निर्माण होईल. देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईसारख्या महानगरात कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक व इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सर्व करताना वनांचा विकास, वन्य जिवांना संरक्षण, समृद्ध पर्यावरणाचा विचार यांच्याशी कुठेही तडजोड केली नसल्याकडे लक्ष वेधले.

पर्यावरण संवर्धनात महाराष्ट्राची अभिमानास्पद कामगिरी

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने घेतली ही अभिमानाची गोष्ट आहे. स्कॉटलंड येथील परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) पुरस्कार मिळाला. यामुळे पर्यावरण बदलात महाराष्ट्र किती गांभीर्याने पुढे जात आहे हे दिसते.

जनतेसाठी संवेदनशील

z महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ग्रामीण भागासह आता शहरांनीही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे.
z सर्वसामान्यांना हक्काची घरे देणे सुरू आहे. राज्यातल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात पिण्याचे पाणी नळाने यावे यासाठीची योजना निश्चित कालमर्यादेत राबविली जात आहे.
z कोविड काळात वेगवेगळ्या श्रमिक, कामगारांना केलेले अर्थसहाय्य असो किंवा पालक गमावलेल्या तसेच निराधार महिलांना आधार, दुर्बल आणि शोषित घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ देणे असो सरकारने अतिशय संवेदनशीलपणे मदतीचा हात पुढे केला आहे.
z महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे साडेचौदा लाख मोफत उपचार आणि शस्त्र्ाक्रिया करण्यात आल्या आणि सुमारे 2600 कोटी रुपये यासाठी आपण रुग्णालयांना दिले.
z आजपर्यंत पोलिसात हवालदारासाठी आपण अधिकारी होणे हे केवळ स्वप्नच होते. आता त्यांचे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निर्णय घेतला.
z राज्याची जलसंपदा वाढविण्यासाठी आपण आता नियोजनबद्ध रीतीने प्रकल्पांची उभारणी करत आहोत.
z आपला महान इतिहास आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी गडकिल्ले संवर्धन किंवा प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार अशा बाबतीतही राज्य शासन गंभीरपणे पावले टाकते आहे.

शेतकऱयांना नवे बळ

शेतीने तर कोविडच्या पहिल्या लाटेपासून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. ‘विकेल ते पिकेल’सारखी योजना असो किंवा बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, शेतकऱयांना नवे बळ देत आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन प्रत्यक्ष राबवून दाखवले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 20 हजार कोटींहून अधिक रुपयांची कर्जमाफी केली आहे. आमच्या या शेतकऱयाने विविध नैसर्गिक आपत्तीत खूप भोगले आहे आणि त्यामुळेच केंद्राच्या एनडीआरएफ निकषापेक्षा नेहमीच वाढीव मदत करून प्रशासनाने त्यांचे अश्रू पुसले आहेत. अशा विविध आपत्तीत कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा असावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यावर काम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱयाकडे सौर ऊर्जेवरील कृषिपंप पोहोचले पाहिजे यासाठी तसे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागानेसुद्धा सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली निघावेत म्हणून महाराजस्व अभियानाची व्याप्ती आणखी वाढवली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

n शेतीने तर कोविडच्या पहिल्या लाटेपासून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. ‘विकेल ते पिकेल’सारखी योजना असो किंवा बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, शेतकऱयांना नवे बळ देत आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन प्रत्यक्ष राबवून दाखवले आहे.

n दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधन सुविधा आणि आताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठय़ा प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत. मला खात्री आहे. या दोन वर्षांत आपलेपणाची नाती रुजली, जसे काम केले तसेच पुढेही होत राहावे आणि आपला विश्वास अधिकाधिक मिळावा.