
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. त्यावेळी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसारित करताना हिंदुस्थानी टीव्ही माध्यमांनी एकतर सरकारशी असलेल्या संबंधापोटी किंवा कारवाईच्या दबावाखाली काल्पनिक युद्धाचे जाळे विणले. मुळात पाकिस्तानात कोणताही सत्तापालट झालेला नाही. टीव्ही माध्यमांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ पूर्णपणे खोट्या होत्या, अशी टीका करीत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने हिंदुस्थानी टीव्ही माध्यमांच्या ‘भाजपप्रेमा’ची पोलखोल केली आहे.
‘गोदी मीडिया’ आणि सत्ताधारी भाजपच्या ‘मिलीभगत’वर बोट ठेवत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात हिंदुस्थानच्या टीव्ही माध्यमांचे अँकर तसेच विश्लेषकांच्या मुलाखती घेऊन हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धासंबंधी खोट्या ‘ब्रेकिंग न्यूज’चा बुरखा फाडला आहे. हिंदुस्थानी टीव्ही माध्यमांनी अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने पाकमधील बंडाच्या आणि दोन अण्वस्त्रधारी देशांमधील युद्धाच्या बनावट बातम्या प्रसिद्ध केल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने हिंदुस्थानच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानने जवळपास सर्व हल्ले हाणून पाडले. या काळात हिंदुस्थानच्या टीव्ही माध्यमांनी अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने अनेक ‘ब्रेकिंग न्यूज’ दिल्या. व्हॉट्सअॅप संदेश, अज्ञात सूत्र आणि सोशल मीडियावरील अफवांच्या मदतीने काल्पनिक युद्धाचे जाळे विणले, असा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या लेखात करण्यात आला आहे.
गोदी मीडियाचे वृत्त अन् वस्तुस्थिती
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानमध्ये बंड झाले असून तिकडे सत्तापालट सुरू आहे, असे वृत्त हिंदुस्थानी मीडियाने दिले. मात्र ते वृत्त खोटे होते. उलट मुनीर यांना हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली.
हिंदुस्थानी सैन्य पाकिस्तानमध्ये घुसले, पाकिस्तानचे पंतप्रधान शरण आले, बंकरमध्ये लपले, कराची बंदर क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करण्यात आले, शहरे उडवण्यात आली, असे वृत्त काही टीव्ही माध्यमांनी दिले. नेमके काय घडतेय हे माहिती नसताना हिंदुस्थानी टीव्ही माध्यमांनी निर्णायक क्षणी चुकीची व भ्रम निर्माण करणारी माहिती दिल्याचा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे सडेतोड दावे
- आजच्या घडीला मोठमोठ्या वृत्तवाहिन्या ‘फ्रँकेन्स्टाईन’च्या राक्षसाप्रमाणे पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलेल्या आहेत.
- हिंदुस्थानातील स्वतंत्र माध्यमांनी अनेक दशके सरकारी खात्यातील भ्रष्टाचार उघड करण्यात, सरकारला जबाबदार धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, गेल्या 10 वर्षांत विशेषतः टेलिव्हिजन क्षेत्रात माध्यमांचे स्वातंत्र्य कमी झाले आहे.
- सध्या हिंदुस्थानातील काही मोठ्या वाहिन्या दररोज सरकारचेच तुणतुणे वाजवत आहेत. यामागे एकतर सत्ताधारी भाजपशी असलेली वैचारिक जवळीक किंवा पत्रकारांवर दहशतवाद, देशद्रोह आणि मानहानी कायद्यांतर्गत खटल्यांच्या टाकलेल्या दबावाचे कारण असेल.
- सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या आणि तपास यंत्रणांमार्फत चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. हिंदुस्थानी टीव्ही मीडियातील काही लोक त्यांचे करिअर वाचवण्यासाठी सरकारचे बोल बोलत आहेत.