
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा कमालीचा घटला असून अवघा 9 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना उद्यापासून राज्य सरकारच्या वैतरणा आणि भातसा तलावांतील राखीव पाणीसाठा पुरवला जाणार आहे. यामध्ये वैतरणा तलावातून 68 हजार दशलक्ष लिटर तर भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर पाणी वापरले जाणार आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. 1 ऑक्टोबरच्या रोजीच्या साठ्यानुसार वर्षभराच्या पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पावसाळा, वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते.
सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा 1327
मोडक सागर 33960
तानसा 14060
मध्य वैतरणा 22034
भातसा 46371
विहार 8995
तुळशी 2308
तलावांकडे पावसाची पाठ
राज्याच्या विविध भागांत जोरदार पावसामुळे पाण्याची चिंता मिटत असताना मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रावर पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा 9 टवक्यांवर आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भातसा व अप्पर वैतरणा तलावांमधून मुंबईला 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर राखीव साठा घेतला जाणार आहे.