केंद्राच्या निष्काळजीपणामुळेच पहलगाम हल्ला झाला, ममता बॅनर्जीं यांची मोदी सरकारवर टीका

पहलगाम दहशतवादी हल्ला केंद्राच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहे. भाजप आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे राजकारण करण्यातही गुंतली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केली आहे. आज बंगाल विधानसभेत ऑपरेशन सिंदूरसाठी सशस्त्र दलांचे कौतुक करणाऱ्या प्रस्तावावर बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आपल्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक कूटनीतिमध्ये काही अडचण आहे की, नाही हे मला माहित नाही. परंतु जागतिक स्तरावर पाकिस्तानला वेगळे करण्याऐवजी ते आयएमएफकडून कर्ज घेत आहे.”

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते? भाजप सरकार आपल्या देशातील लोकांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे आणि म्हणूनच ते सत्तेबाहेर असले पाहिजे.” त्या म्हणाल्या की, “दहशतवादाला कोणताही धर्म, जात किंवा पंथ नसतो. आम्ही त्याचे समर्थन करत नाही.” पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान फक्त स्वतःचा प्रचार करण्यात गुंतले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान करणारा प्रस्ताव बंगाल विधानसभेत मांडण्यात आला आहे.