पश्चिम आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच, ‘पीक अवर्स’ला प्रवाशांचे प्रचंड हाल; अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्याची घोषणा करणारे रेल्वे प्रशासन लोकल सेवेचे वेळापत्रक सुस्थितीत ठेवण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाडय़ांना 20 ते 30 मिनिटांचा विलंब झाला. तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. ऐन ‘पीक अवर्स’ला हा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

पश्चिम रेल्वे मार्गावर सलग तिसऱ्या दिवशी लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. विरार, भाईंदर, बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ांना जवळपास 20 ते 30 मिनिटांचा विलंब झाला. नियमित प्रवाशांनी गाडय़ांच्या विस्कळीत वेळापत्रकाबाबत विविध माध्यमांतून रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या. गाडय़ांच्या विलंबाबरोबरच अनेक लोकल फेऱया रद्द करण्यात आल्याने सर्वच स्थानकांत सकाळच्या सुमारास मोठी गर्दी उसळली होती. अशीच स्थिती मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अनुभवायला मिळाली.

नोकरदारांना लेटमार्क

कर्जत, कसारा, कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ा 15 ते 25 मिनिटे उशिराने धावल्या. परिणामी, आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासलेटमार्कलागला. अलीकडच्या काही दिवसांत मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक खराब झाले आहे. लोकल सेवेत सुधारणा करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाला व्यवस्थापनात आलेले अपयश नियमित प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण करीत आहे.