नोकरभरती उरणला, जाहिराती इंग्रजी पेपरला आणि मुलाखती गुजरातला; जेएनपीएतील न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनलचा महाराष्ट्र द्वेष

महाराष्ट्रात हिंदी भाषा रेटण्याचा सरकारचा डाव असताना आता भूमिपुत्रांच्या हक्कांवर गुजराती वरवंटा फिरणार असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या जेएनपीए बंदरातील न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनलमध्ये नोकरभरती होणार आहे. मात्र यासंदर्भातील जाहिरातबाजी मराठी ऐवजी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये करून मुलाखती थेट गुजरातच्या मुंद्रा बंदरात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या नोकऱ्या नेमक्या कोणाच्या घशात घालायच्या आहेत असा संतप्त सवाल उरणकरांनी केला असून महाराष्ट्रद्वेष्टय़ा फ्री पोर्ट टर्मिनलविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीए बंदर उभारण्यासाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतजमिनी या प्रकल्पाला दिल्या. त्यावेळी जेएनपीएने स्थानिक भुमिपुत्रांना  भरभरून रोजगार देण्याची ग्वाही दिली. मात्र जमिनी ताब्यात घेतल्यानंतर जेएनपीए बंदर प्रशासन भुमिपुत्रांना कस्पटासमान वागणूक देत असून भुमिपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप उरणकरांनी केला आहे.

जेएनपीएमध्ये न्हावाशेवा फ्री पोर्ट हे खासगी टर्मिनल आहे. या कंपनीत सध्या नोकर भरती सुरू असून तशी जाहिरातच फ्री पोर्टच्या प्रशासनाने एका इंग्रजी वृत्तपत्रात दिली आहे. या प्रकल्पात कामगार भरतीत स्थानिक भूमिपुत्रांचा पहिला हक्क असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी नोकर भरतीसाठी जाहिरात स्थानिक व मराठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध न करता इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पासाठी भुमिपुत्रांनी त्याग केला असताना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मात्र गुजरातमधील मुंद्रा येथे घेतल्या जाणार असल्याचे उघड झाले आहे. फ्री पोर्ट टर्मिनल प्रशासनाच्या या कारस्थानाची माहिती मिळताच भुमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी थेट जेएनपीएच्या अध्यक्षांची भेट घेत आमच्या हक्काच्या नोकऱ्या गुजरात्यांच्या घशात का घालता असा जाब विचारला.

भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करा

जेएनपीए बंदर तसेच उरणमधील अन्य प्रकल्पांमध्येदेखील यापूर्वी स्थानिकांना डावलून परराज्यातील उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. आताही हाच डाव असल्याने भुमिपुत्रांना अंधारात ठेवून गुजरातमध्ये मुलाखती घेतल्या जात असल्याचा आरोप उरणकरांनी केला आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तत्काळ रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराच भुमिपुत्रांनी दिला आहे.