
ऐतिहासिक विशाळगडावरील 14 अतिक्रमणे पुरातत्व, वन आणि महसूल विभागाकडून संयुक्त मोहीम राबवत सात तासांत जमीनदोस्त करण्यात आली. गडावर एकूण 158 अतिक्रमणे होती, पैकी 94 अतिक्रमणे यापूर्वीच काढण्यात आली होती. उर्वरित 64 पैकी 45 अतिक्रमणधारकांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे, तर 5 जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली होती. शनिवारच्या कारवाईमुळे आतापर्यंत गडावरील 113 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणाने गडाचे पावित्र्य नष्ट होत होते. अतिक्रमणामुळे गडाचे विद्रुपीकरण झाल्याने तसेच अनैतिक व गैरव्यवहाराचे प्रकार समोर येत असल्याने, ही अतिक्रमणे तत्काळ हटविण्याबाबत शिवप्रेमींमधून मागणी होत होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली. गेल्यावर्षी अतिक्रमणमुक्त मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या कालावधीत गडावरील काही अतिक्रमणे काढण्यात आली, तर काही अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने स्थगितीचा अडथळा आला होता.
न्यायालयाच्या नोटिसा
गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुन्हा शिवप्रेमींकडून जोर वाढल्यानंतर शासनाने गड किल्ल्यावरील अतिक्रमणे 31 मे 2025 पर्यंत काढण्याची सूचना केली होती. मुंबई उच्च न्यायालयात किल्ले विशाळगड येथील स्थगिती नसलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे काढण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 30 मे रोजी तहसील कार्यालय व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना विशाळगड येथे जाऊन त्यांची अतिक्रमणे 31 मे 2025 रोजी काढण्यात येणार असल्याने, त्यांचे घरगुती साहित्य इतरत्र ठिकाणी हलवण्याबाबत पूर्वकल्पना दिलेली होती. अतिक्रमणधारकांनी सायंकाळी आपले साहित्य अतिक्रमित ठिकाणांमधून हलविण्यास सुरुवात केली.
सकाळी कारवाईला सुरुवात
शनिवारी सकाळी आठच्या सुमारास अतिक्रमणे काढण्याच्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. या वेळी कारवाईमध्ये 11 अतिक्रमणधारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे काढून घेतली. त्यासाठी त्यांना सार्वजनिक बांधकाम, वनविभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. यावेळी सत्तार काशीम म्हालदार, हाफिज युसूफ शेख, आफरीन रियाज हवालदार, राजेंद्र नारायण कदम, बावाखान अहमद मुजावर, मौलाना खोली, इम्रान अब्दुलगणी मुजावर, शकील मिरासाहेब मुजावर, सुलतान दाउद म्हालदार, यास्मीन मुबारक मलंग, शबाना नासीर शहा यांची अतिक्रमणे काढण्यात आली. यापूर्वी पुरातत्व विभागामार्फत अर्धवट काढलेल्या 3 इमारतींची अनधिकृत बांधकामे पूर्णपणे काढण्यात आली.
अतिक्रमण काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी पन्हाळा, सहायक वनसंरक्षक वनीकरण व पॅम्पा कोल्हापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी पन्हाळा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे 40 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 80 मजूर व महसूल विभागाचे 25 कर्मचारी उपस्थित होते. तसेच 100 पोलीस तैनात करण्यात आले होते. ही अतिक्रमणविरोधी कारवाई शांततेत पार पडली.