41 नगराध्यक्ष व 1006 नगरसेवक विजयी कॉँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना या निकालाने चोख प्रत्युत्तर

नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत अत्यंत विपरीत परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना केवळ लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून सत्ताधाऱयांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. या निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष व 1006 नगरसेवक विजयी झाले. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना या निकालाने चोख उत्तर दिले आहे, असा टोला कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

भाजप व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पैशाचा प्रचंड वापर करून प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला असला तरी जनतेच्या मनात आजही काँग्रेस आहे व पुढेही ती कायम राहील. ही विचाराची लढाई आहे आणि काँग्रेस विचारधारेपासून तसूभरही दूर गेलेला नाही. नगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय हा महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ऊर्जा देणारा आहे. महाभ्रष्ट भाजप महायुतीपासून महाराष्ट्र वाचविण्याचा काँग्रेसचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील असे सपकाळ म्हणाले.

निवडणुकीत विजय-पराजय होत असतात, काँग्रेस पक्षाने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. पराभवाने खचून न जाता मोठय़ा उत्साहाने लढण्याची ताकद, ऊर्जा व दृढ निश्चय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांचा हा विश्वासच पक्ष संघटनेसाठी महत्त्वाचा असतो. याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. काँग्रेसची विचारधारा हीच देशाला तारणारी आहे. जाती-धर्माच्या नावावर सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय पोळी भाजणाऱया व पैशाच्या जोरावर सर्व निवडणुका जिंकता येऊ शकतात असा समज जनतेने खोडून काढला आहे, असे सपकाळ म्हणाले.

नागपूर विभागात 14 नगराध्यक्ष व 340 नगरसेवक, अमरावती विभागात 9 नगराध्यक्ष व 236 नगरसेवक, मराठवाडय़ात 5 नगराध्यक्ष व 156 नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्रात 3 नगराध्यक्ष आणि 47 नगरसेवक, उत्तर महाराष्ट्रात 2 नगराध्यक्ष व 47 नगरसेवक आणि कोकण विभागात 1 नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबत काँग्रेस पुरस्कृत स्थानिक आघाडय़ांचे 7 नगराध्यक्ष व 154 नगरसेवक निवडून आले आहेत.