
ग्रामीण भागामध्ये आजही अनेक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी अडचण असून, रस्ता नसल्याने शेती करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रांताधिवारी सुधीर पाटील यांनी नगर व नेवासा तालुक्यात शिवरस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया राबवली आणि एकूण 45 रस्ते मोकळे करून दिले. यामुळे मोठी अडचण दूर झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आजही शेताकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत. अनेक ठिकाणी बांधावरून वाद सुरू असून, अनेक ठिकाणी खटले दाखल आहेत. शिव रस्ते मोकळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करण्यात येत होते. मात्र, अंतर्गत वादामुळे या रस्त्यांची हद्द निश्चित होत नव्हती. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधत हद्द निश्चिती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गेल्या वर्षभरामध्ये हे काम सुरू होते.
रस्त्याअभावी शेती करणे अवघड होते. अनेक ठिकाणी जमिनी पडीक झाल्या होत्या. काही ठिकाणी जमीन कसून उत्पन्न काढले. पण, माल ने-आण करण्यासाठी रस्तेच नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळेच प्रांताधिवारी सुधीर पाटील यांनी गावांमध्ये असे रस्ते खुले करण्याचा सुमारे वर्षभरापूर्वी निर्णय घेतला. त्यासाठी नेवासाचे तहसीलदार संजय बिरादर आणि नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी या संदर्भातले आदेश करत प्रत्येक गावामध्ये जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर बैठका घेत नियोजन आखले. या दोन्ही तहसीलदारांनी
प्रारूप आराखडा तयार करत ज्या हद्दी निश्चित झालेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी तलाठी, मंडल अधिवारी यांना बरोबर घेत गावकऱ्यांना एकत्रपणे आणत यातून मार्ग काढला.
वर्षानुवर्षांपासून बंद असलेले शिवरस्ते मोकळे झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पडिक जमिनी आता कसता येणार आहे, तर गावाला जोडण्यासाठी मार्ग झाल्याने शेतकरी, नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
नेवासातील एकूण खुले झालेले रस्ते
नेवासा तालुक्यात क्षेत्रीय कार्यालयांसाठी शासननिर्णयानुसार कृती आरखडा राबवण्यात आला. त्यात भेंडा-कुकाणा, गोंडेगाव-म्हसले, निंभारी-अंमळनेर, धनगरवाडी-तामसवाडी, तेलकुडगाव-भातकुडगाव, अंतरवली-नांदुरशिवारी, चांदा-बऱहाणपूर, खेडले परमानंद-शिरेगाव, रांजणगाव-नागापूर, रांजणगाव-सौंदाळा इत्यादी 14 शिवरस्ते खुले करण्यात आले आहे. याचा सुमारे 118 शेतकऱ्यांना लाभ झाला.
नगर तालुक्यातील गावांची नावे
खादगाव टाकळी-वडगाव अमली, नेप्ती-निंबळक रस्ता, धनगरवाडी, जेऊर, वाघवाडी जेऊर, पिंपळगाव उजनी-आढाववाडी, पिंपळगाव-वाघजाई माता मंदिर, केडगाव-बोलेगाव, खंडारे वस्ती-घोसपुरी अशा गावांचा समावेश आहे. एकूण 302 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला.
नगर व नेवासा तालुक्यातील सर्व जनतेला बरोबर घेत त्यांच्या भागातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असताना शिवरस्ते आम्ही एकत्रितपणे मार्ग काढून सोडवले. यामुळे संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिवारी, तलाठी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असताना याला येथील जनतेने चांगली साथ दिली. त्यामुळे हे यश साध्य करता आले. रस्ते तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांना बांधापर्यंत जाता येत असून, दळणवळण अधिक सोयीचे झाले. अनेक वर्षांचा हा प्रश्न मार्गी लागला.
– सुधीर पाटील, प्रांताधिवारी