
प्रेमभंगातून एका तरुणीने स्वतःचे जीवन संपवले. तरुणीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच प्रियकर तेथे आला आणि चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला अडवलं आणि बेदम चोप दिला. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनुराग मेश्राम असे तरुणाचे नाव आहे. कामठीतील कन्हान नदीच्या शांती घाटावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
अनुराग आणि मयत तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र अलिकडे त्यांच्या नात्यात दुरावा आला. यामुळे नैराश्येतून तरुणीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 194 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
तरुणीचा मृतदेह शांती घाटावर सायंकाळी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. यावेळी अनुराग तेथे आला आणि भावनेच्या भरात त्याने प्रेयसीच्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला रोखले आणि बेदम चोपले. या मारहाणीमुळे अनुराग बेशुद्ध झाला. यानंतर अनुरागचे वडील आणि भावाने पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. अनुराग शुद्धीवर आल्यावर पुढील तपास करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.