गंगाधाम चौक परिसरात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना बंदी, पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी

बेदरकार ट्रक चालकाने दुचाकीस्वारासह प्रवाशी महिलेला चिरडल्याची घटना बुधवारी (दि.११) सकाळी अकरा वाजता गंगाधाम चौकात घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी अपघातस्थळी भेट देऊन गंगाधाम चौकाची पाहणी केली. त्यानंतर परिसरात सकाळी ६ ते रात्री १० पिक अवर्समध्ये अवजड वाहतूक बंदीचे आदेश काढले. तर, नागरिकांच्या तक्रारीनुसार परिसरातील वाईन शॉप आणि परमिट रुमवर कारवाईचा बडगा उगारला. महापालिका प्रशासनासोबत रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण आणि बेकायदेशीर इमारतींवर कारवाईबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दीपाली युगेंद्र सोनी (वय – 29) यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासरे जगदीश पन्नालाल सोनी (वय – 61) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी (वय – 51) याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असून, यापक्ररणी आम्ही कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासोबतच परिसरात ताप्तुरत्या स्वरूपात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत अवजड वाहतुकीस बंदीचा आदेश दिला आहे. मात्र, मार्केटयार्डमध्ये येणाऱ्या जड वाहनांच्या वेळांसंदर्भातही योग्य तो निर्णय चर्चा करून घेतला जाणार आहे. तसेच परिसरातील अवैध गोडाऊन सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. जोपर्यंत संबंधित लोक इमारतीचा आराखडा दाखवत नाहीत, तोपर्यंत ते गोदाम बंद ठेवले जाणार आहे. तसेच जी नव्याने बांधकामे सुरू आहेत, त्यासंदर्भाने रात्रीच्या वाहतुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यास पालिकेला सांगण्यात येणार आहे. ज्या परिसरात जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, तेथे हाईट बॅरिअर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अनधिकृत इमारतींसह अतिक्रमणांवर कारवाई करा

गंगाधाम परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतींसह अतिक्रमणे आहेत. संबंधित सर्व ठिकाणी महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर मोठा रोष व्यक्त केला. घटनेच्या वेळी वाहतूक पोलीस इमारतीच्या आत आराम करत होते, असा आरोप केला. तर अनेकदा वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी अंमलदार कोपऱ्यात उभे राहून पावत्या फाडत बसतात. येथे जड वाहतुकीस बंदीचा फलक होता, तो ही काढण्यात आला आहे. ठराविक वेळत जड वाहतुकीस बंदी असताना सर्रास जड वाहने रस्त्याने धावतात. ही बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. यावर पोलीस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.

अपघातग्रस्त ट्रकमालकाचे सर्व ट्रक जप्तीचे आदेश

बेदरकारपणे ट्रक चालवून महिलेला चिरडल्याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाचे सर्व ट्रक जप्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून कारवाईला गती देण्यात आली आहे. दरम्यान, घरात आणलेल्या मृतदेहाला पाहून आई, मला शाळेचे दफ्तर घेऊन का आली नाही, अशाप्रकारे लहान मुलीने विचारलेल्या भाबड्या प्रश्नामुळे अनेकांना गलबलून आले.