शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देता येत नसतील तर खुर्च्या खाली करा, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला इशारा

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजप युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्दल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

भाजप युती सरकार हे फक्त अदानी-अंबानीसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सूरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तिपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत, असा सवाल सपकाळ यांनी केला आहे.

दिल्लीत जाऊन निधी आणा

राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी-शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.