
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात भाजप, मिंधे आणि अजितदादा गटाने आश्वासनांची खिरापत वाटली होती. कर्जमुक्त करण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांची मते घेण्यात आली. मात्र गरज सरो… या म्हणीप्रमाणे भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, असा शब्द आम्ही दिलाच नव्हता, असे म्हणत पालकमंत्री अतुल सावे यांनी चक्क कानावर हात ठेवले.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप, मिंधे तसेच अजितदादा गटाने आकाशपाताळ एक केले होते. केवळ निवडणूक जिंकायची या ईर्षपोटी वाट्टेल ती ती आश्वासने जनतेच्या तोंडावर फेकून मारण्यात आली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी आश्वासनांची खैराता वाला हमी भावना आदी आश्वासनाची अक्षरशः दरोडा घातला. सत्ता मिळताच या त्रिकुटाने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही असा शब्द दिलाच नव्हता, असे धादांत खोटे बोलत आहेत. हिंगोली दौऱ्यावर आलेले पालकमंत्री अतुल सावे यांनाही पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून छेडले असता त्यांचा नूरच पालटला. आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असा उल्लेखच नसल्याचे त्यांनी दरडावून सावेंचा झालेला तीळपापड पाहून पत्रकारही अवाक् झाले.
भाजपचा जाहीरनामा तपासा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून महायुती सरकार अडचणीत आले आहे. माजी मंत्री बच्चू कडु यांचे उपोषण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात झालेला गोंधळ यामुळे महायुतीची राज्यभर शोभा झाली आहे. त्यातच भाजपच्या मंत्र्यांना ताळतंत्र न राहिल्याने होणाऱ्या बेअब्रूत भर पडत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आम्ही कुठेही बोललो नाहीत, असे रेटून सांगतानाच अतुल सावे यांनी पाहिजे तर भाजपचा जाहीरनामा तपासा, अशी गुर्मीही दाखवली !
सावेसाहेब, उघडा डोळे, वाचा नीट…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 11 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपले ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध केले होते. या संकल्प पत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सावे यांनी शेतकऱ्यांचीच फसवणूक केली नाही, तर आपल्या ज्येष्ठ नेत्यांनाही तोंडघशी पाडले आहे.