
तळेगावजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 55 जण वाहून गेले. त्यातील चार पर्यटक मृत्युमुखी पडले, तर 51 जणांना वाचवण्यात यश आले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटना घडली तेव्हा किमान 100 पर्यटक पुलावर होते. त्यातील नेमके किती जण कोसळून वाहून गेले हा आकडा समोर आलेला नाही. नदीपात्रात पडलेल्या लोखंडी कमानीखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक रांजणखळग्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगाव येथील कुंडमळा येथे येतात. गेल्या दोन दिवसांपासून तळेगाव परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो पर्यटक कुंडमळा येथे पर्यटनासाठी आले होते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा एक पूल आहे. हा पूल किमान 30 वर्षे जुना आहे. पूर्वी हा पूल संपूर्णपणे लोखंडी होता. काही वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंटचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचा मध्यभाग हा लोखंडीच होता. अनेक पर्यटक आपल्या दुचाकी वाहनांसह पुलावर पर्यटनाचा आनंद घेत होते. याचवेळी पुलाचा मोठा आवाज झाला आणि लोखंडी पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर पुलावरील सर्व पर्यटक आणि त्यांच्या दुचाकी नदीपात्रात पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काही पर्यटक पाण्यात वाहत गेले. या दुर्घटनेत 38 पर्यटक जखमी झाले. त्यापैकी सहा पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना लगतच्या पवना, मायमर आणि अथर्व रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस, एनडीआरएफ, शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षक, मावळ, आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे तासाभरानंतर दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान,सहा महिन्यांपूर्वी या पुलावरून दुचाकी पडून नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार रोटरी क्लबने जाळी बसवून दिली होती.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
पावसाळ्यात दरवर्षी कुंडमळा येथे दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. पाण्याचा प्रवाह, नदीतील खडकांवरून वाहणारे पाणी, धबधबे, यामुळे पुंडमळा हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. रविवारी शेकडो पर्यटक या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेत होते. नदीतील खडक आणि लोखंडी पुलाचा सांगाडा यामुळे पर्यटक पाण्यात अडकून पडले. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
कुंडमळा येथे वर्षा सहलीसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब आले होते. यातील अनेक नागरिक पत्नी, मुलांसह दुचाकीवर पुलावर गेले. त्या वेळी त्यांचे नातेवाईक फोटो काढत होते. त्यातच अचानक पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. पूल कोसळताच एकच आक्रोश झाला.
ही घटना दुर्दैवी, वेदनादायी आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध केले जात आहेत. पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. – अजित पवार (उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री)
पूल कोसळल्यामुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. केदारवाडी येथील ग्रामस्थांना शेतीसाठीची खते, अवजारे खरेदी करण्यासाठी इंदोरी येथे जावे लागते, तर कुंडमळा येथील शालेय विद्यार्थी, व्यावसायिकांना पुण्यात जाण्यासाठी लोकलने प्रवास करण्याकरिता बेगडेवाडी किंवा तळेगाव रेल्वे स्टेशन येथे जावे लागते.
पुलाचा सांगाडा उचलण्याचे आव्हान
लोखंडी पुलाचा संपूर्ण सांगाडा नदीत कोसळला आहे. पुलावर दुचाकी तसेच चालत असणारे अनेक पर्यटक नदीत कोसळले. काही पर्यटक या पुलाच्या सांगाडय़ाखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी चार मोठय़ा व्रेन बोलावून सांगाडा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीचे पाणी, पात्रातील खडक आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे पुलाचा सांगाडा जाग्यावरून बाजूला करणे, हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.मृतांची नावे रोहित माने (35), विहान माने (5) दोघे रा. चिंचवड. चंद्रकांत साठले (65), रा. हडपसर. चेतन चावरे, रा. तळेगाव.
पूल धोकादायक असूनही ठेवला खुला
कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर सुमारे 30 वर्षांपूर्वी लोखंडी पूल बांधण्यात आला होता. पूल कमकुवत झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याला सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात आला होता. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नवीन पूल बांधण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागण्या केल्या. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. हा पूल गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तरीही आज दुर्घटना घडली तेव्हा पुलावर अनेक दुचाकी होत्या.