मुद्दा – आयुष्य हे असेच आहे!

>> विजय पांढरीपांडे

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण अपघाताच्या बातमीने मन सुन्न झाले. नैसर्गिक आपत्ती, भीषण अपघात, त्यात शेकडोची मनुष्यहानी या बातम्या माणसाला तात्पुरत्या बधिर करणाऱ्या असतात. अशा वेळी काही सुचेनासे होते. सगळे तर्क निरर्थक ठरतात. आपले शहाणपण, आपला विवेक आपलीच कीव करायला लागतो. अशा घटनांचे विश्लेषण करणेदेखील कठीण असते. वेदपुराण ग्रंथातील तत्त्वज्ञानदेखील अपुरे पडते. नवे शोध, नवे तंत्रज्ञान यामुळे आपले जीवन सुलभ, सुखदायी झाले खरे, पण शेवटी हे सगळे मानवनिर्मित. म्हणजे चुकांची शक्यता गृहीत धरणे आलेच. मुळात विज्ञान हे अनिश्चिततेच्या पायावर उभे असते. कालचे विज्ञान आज खोडून काढले जाते.

हे तंत्रज्ञानाचे झाले, पण आपले स्वतःचे तरी भविष्य कुठे कुणाला माहिती असते? अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांचा वैमानिक, कर्मचारी यांच्यासह प्रवास सुरू झाला तेव्हा त्यापैकी कुणालाही कल्पना नसेल की आपले आयुष्य आता पाचच मिनिटांचे आहे. पाच मिनिटांत सगळे काही संपणार आहे. परदेशी नागरिक उत्सुक असतील काही तासांत घरी पोहोचण्यासाठी, आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी, काही पर्यटनासाठी, कामासाठी निघाले असतील, काही नव्या उद्योगाच्या, प्रकल्पाच्या कामासाठी प्रवास करीत असतील. कर्मचारी पंधरा मिनिटांत बेल्ट काढून प्रवाशांना सेवा देण्याची वाट बघत असतील. काहींना विमानतळावर सोडायला, निरोप द्यायला आलेली मंडळी घरी परतीच्या मार्गावर असतील. त्यांचा प्रवास सुखाचा होवो अशा प्रार्थना करत असतील मनातल्या मनात! पण कुणाचेच काही खरे ठरले नाही. सगळय़ांचे अंदाज चुकले.

आपले आयुष्य, भविष्य… सगळेच किती अनिश्चित, अकल्पनीय आहे याची कल्पना येते अशा घटनांवरून. अशा घटना आपल्याला आपल्या आतमध्ये डोकावायला भाग पाडतात. आपलेच परीक्षण करायला मजबूर करतात.

आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते की, माझेच दुःख मोठे. माझ्यावरच देव नेहमी अन्याय करतो. सगळे दुःख माझ्याच नशिबी येते. मीच कमनशिबी! बाकी सगळे जग सुखी, आनंदी. सगळय़ांना सगळे मिळते. प्रत्येकाला देव हवे ते, हवे तितके देतो. आपलीच झोळी फाटकी. आपल्या पदरात हवे ते, हवे तितके कधीच पडत नाही. आपल्याच बाबतीत देव पक्षपात करतो. आपल्यालाच तो सुखापासून वंचित ठेवतो. आपल्यात काही कमी नसताना, आपली क्षमता असताना, आपण परिश्रम करूनही आपल्याला मिळते ते फक्त अपयश, फक्त दुःख! आपण हेच रडगाणे गात चांगले आयुष्य वाया घालवतो. त्याचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर होतो. आपण रागीट होतो. विनाकारण आरडाओरड करायला लागतो. आपला संताप होतो. तो राग, संताप आपण घरच्यावर काढतो. मित्रावर काढतो. परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत जाते. अशा अचानक घडणाऱया घटना मात्र आपल्याला ‘तुला शिकवीन चांगला धडा’ अशी तंबी देणाऱया असतात. आता अहमदाबादच्या विमान अपघातात मृत झालेल्यांच्या नशिबाची कल्पना करा. कुणाचा काय दोष होता की, त्यांना ही अनपेक्षित दुर्दैवी पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा मिळावी? त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रांची, सहकाऱयांची कल्पना करा. त्यांनी काय पाप केले की, आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या भयंकर अघटित पद्धतीने घडलेल्या मृत्यूचे दुःख, असहनीय वियोगाचे दुःख त्यांच्या ओंजळीत पडावे? तेही ध्यानीमनी नसताना? हा असा विचार केला की, मग आपल्याला समजेल, आपण कितीतरी सुखी, आनंदी आहोत. आपण जिवंत आहोत. आयुष्य एन्जॉय करतो आहोत. आपल्या नशिबात ज्याला आपण दुःख, अपयश म्हणतो ते काहीच नाही या भयंकर अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुःखापुढे! त्यांना तर त्या गेलेल्या व्यक्तीचे शवदेखील दिसणार नाही. अंत्यदर्शनदेखील घेता येणार नाही. त्या व्यक्तीशिवाय जगण्याचे, प्रेमळ, जिव्हाळय़ाच्या संबंधाला कायमचे मुकण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले! हे अशा वियोगाचे दुःख कल्पनातीत असते. त्यापुढे आपले दुःख, आपले अपयश, आपल्या जीवनातील अभाव काहीच नाही. अगदीच क्षुल्लक. असा विचार करायला आपण शिकले पाहिजे. शेवटी वेदना, संवेदना, आनंद, दुःख या सगळय़ा रिलेटिव्ह टर्म्स आहेत. दुःख हे शेवटी दुःखच असते. कुणाचे तोळाभर कुणाचे मणभर असे काही नसते.

आयुष्यातील असे अपघात, अशा घटना आपल्याला खूप काही शिकवून जातात. मुख्य म्हणजे आपला माज उतरवतात. आपण चंद्रावर गेलो, आपण हे केले, एवढे शोध लावले, एवढी झेप घेतली हा जो भ्रमाचा भोपळा आहे तो अशा वेळी चटकन फुटतो. हवेत उडणारा आपल्या अभिमानाचा गर्वाचा फुगा टचकन फुटून खाली येतो. आपले विमान कोसळून जमिनीवर आदळते. त्या एअर इंडियाच्या विमानासारखेच!! आपण देव नाही, माणूस आहोत ही जाणीव द्यायला, आपले डोळे उघडायला या अशा घटना पूरक ठरतात. आयुष्य हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट पिक्चर आहे हा धडा ही मिळतो यातून… या सर्व मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी होताना आपण हे सगळे भान ठेवले पाहिजे. आयुष्य हे असेच असते हे सत्य स्वीकारले पाहिजे.