
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेस काही तास उलटत नाही तोच उल्हासनगरच्या गणेशनगर या भागात असलेल्या नाल्यावरील धोकादायक पूल अचानक पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे 500 रहिवाशांचा जवळचा रस्ता बंद झाला असून येथील रहिवाशांना आता लांबचा वळसा घालावा लागत आहे.
कॅम्प नंबर पाचमध्ये भलामोठा नाला वाहत असून त्याला लागूनच दाटीवाटीने अनेक घरे उभारण्यात आली आहेत. 40 वर्षांपूर्वी या नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र तो धोकादायक झाल्याने स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. धोकादायक पुलावरूनच स्थानिक नागरिक ये-जा करीत होते. पुलावर काही ठिकाणी खड्डे पडले होते तर काही ठिकाणी सळ्यादेखील बाहेर आल्या होत्या. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसातच हा पूल कोसळला. त्यात कोणालाही इजा झाला नाही.
बांधकाम विभागाचा कारभार चव्हाटय़ावर
सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे. नाल्याचा प्रवाह मोठा असल्याने कोसळलेला पूल बाजूला करण्यात अडथळे निमाण होत आहेत. दरम्यान याच जागेवर नवा मजबूत पूल उभारावा, अशी मागणी उल्हासनगरवासीयांनी प्रशासनाकडे केली आहे.