
फटकळ स्वभावाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा दिवंगत धीरुभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या एका विधानाने चांगलाच वाद पेटला आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरून कोटय़धीश झाले, असे वक्तव्य एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अजितदादा यांनी केले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार दंड थोपटून उतरलेत. त्यांनी ‘ब’ वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी येथे आयोजित सभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्याचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत अजितदादांना त्यांनी केलेल्या घोटाळय़ांची आठवण करून दिली आहे. धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोटय़धीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून आपण काय केलेत, असे सवाल केले आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
मला सहकार टिकवायचे नसते तर मी पेट्रोल पंप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरीबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोटय़धीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
सारवासारव… चोरून नाही, सोडून!
अजितदादांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. मी धीरूभाई यांच्याविषयी एखादा वेगळा शब्द वापरला तर राजकारण सोडेन, असे ते म्हणाले. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादा चोरून नाही, तर पेट्रोल सोडून बोलले, असा खुलासा केला.